नवी दिल्ली – दिल्लीच्या चारही बाजूने धरणे धरून बसलेल्या शेतकऱ्यांनी आपल्या मागण्यांविषयी केंद्र सरकारवर दबाव आणण्यासाठी सोमवारी एक दिवसांचे लाक्षणिक उपोषण आयोजित केले आहे. 25 ते 27 या अवधीत हरियानांतील सर्व टोल नाके बंद पाडण्याचा इशाराही त्यांनी दिला आहे.
स्वराज इंडियाचे प्रमुख योगेंद्र यादव यांनी ही माहिती देताना सोमवारी सर्व निदर्शक शेतकऱ्यांनी देशाच्या सर्व भागात केंद्राच्या विरोधात निदर्शने करावीत असे आवाहनही त्यांनी केले आहे.
शेतकरी नेते जगजीतसिंग दलेवाला यांनी सांगितले की आंदोलनाचा पुढील टप्पा म्हणून आम्ही 25 ते 27 डिसेंबर या अवधीत हरियानातील सर्व टोलनाके बंद पाडणार आहोत.
भारतीय किसान युनियनचे नेते राकेश टिकैत यांनी सांगितले की आंदोलक शेतकरी 23 डिसेंबर रोजी किसान दिवस पाळणार आहेत. त्या दिवशी कोणीही घरात अन्न न शिजवता शेतकऱ्यांना पाठिंबा द्यावा असे आवाहनही त्यांनी केले आहे.