नवी दिल्ली – करोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर यंदा संसदेचे हिवाळी अधिवेशन रद्द करण्यात आले आहे. यासंदर्भात संसदीय कामकाज मंत्री प्रल्हाद जोशी यांनी एक पत्रकदेखील जारी केले आहे. प्रल्हाद जोशी यांनी यंदाचे हिवाळी अधिवेशन होणार नसल्याचे स्पष्ट केले आहे. आता थेट जानेवारीत सरकार अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू करू शकते. यासाठी सर्वच राजकीय पक्षांनी अनुकूलता दर्शवली आहे.
यातच हिवाळी अधिवेशन रद्दच्या मुद्यावरून शिवसेना खासदार संजय राऊत यांनी भाजप टीका केली आहे. खासगी वृत्तवाहिनीशी बोलताना ते म्हणाले, कोरोना काळात राज्यात मंदिरे उघडण्याची भाषा करणाऱ्या भाजपने संसदेचे हिवाळी अधिवेशन का रद्द केले. लोकशाहीचे मंदिर का बंद केले आहे? असा खोचक प्रश्नही त्यांनी मोदी सरकारला विचारला आहे.
काय म्हणाले संजय राऊत
‘भाजप सोयीनुसार सवडीनुसार लोकशाही, स्वातंत्र, आणिबाणीच्या वाख्या ठरवत आहे. राज्यात भाजपचे एक धोरण असते, देशात वेगळे असते. कोरोनाच्या नावाखाली संसदेचे हिवाळी अधिवेशन घ्यायचे नाही हे ढोंग आहे. कोरोना हे जर संसदेचं हिवाळी अधिवेशन न घेण्याचं खरं कारण असेल. तर, बिहारची निवडणूक कशी झाली. बिहारमध्ये लाखोच्या सभा कशा झाल्या, बंगालमध्येही निवडणूकांसाठी जोरदार जमवाजमव सुरू आहे. एकीकडे राज्यातही मंदिरे उघडा, शाळा उघडा अमूक उघडा तमूक उघडा असे भाजपकडून केले गेले. मग त्यांनी हिवाळी अधिवेशन का रद्द केले.?