पुणे – राज्याच्या सीईटी परीक्षेत चांगले गुण मिळवणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या यंदा वाढली आहे. त्यामुळे नामांकित अभियांत्रिकी महाविद्यालयांतील प्रवेशासाठी चुरस निर्माण होणार आहे. याउलट मधल्या फळीतील आणि तळातील अभियांत्रिकी महाविद्यालयांना यंदाही प्रवेशासाठी विद्यार्थ्यांची शोधाशोध करावी लागणार असल्याचे चिन्हे आहेत.
राज्यातील महाविद्यालयांमधील अभियांत्रिकी, औषधनिर्माण, कृषी अभ्यासक्रमासाठी घेण्यात आलेल्या प्रवेश परीक्षेचा निकाल नुकताच जाहीर झाला. यंदा शंभर पर्सेटाईल म्हणेज सर्वाधिक गुण मिळवणाऱ्या विद्यार्थ्यांचे प्रमाण वाढले आहे.
अभियांत्रिकीच्या प्रवेशासाठी भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र, गणित (पीसीएम) या विषय गटांची परीक्षा देणाऱ्या 22 विद्यार्थ्यांना 100 पर्सेटाईल मिळाले आहेत. त्याशिवाय 85 ते 100 पर्सेटाईल मिळवणारे 26 हजार 502 विद्यार्थी आहेत. त्यामुळे नामांकित महाविद्यालयांतील प्रवेशासाठी स्पर्धा वाढणार आहे.