हर्षद कटारिया
बिबवेवाडी, – शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या पर्वती येथील टाक्यांच्या दुरवस्थेबाबतचे वृत्त देऊन “प्रभात’ने या प्रश्नाला वाचा फोडताच प्रशासनासह लोकप्रतिनिधीही खडबडून जागे झाले आहेत. 40 वर्षांपेक्षा अधिक जुन्या असलेल्या सुमारे 20 टाक्या धोकादायक असल्याचे तसेच त्यांचे बांधकाम जीर्ण झाले असून अशा टाक्यांचे तातडीने स्ट्रक्चरल ऑडिट करण्याबाबतचे पत्र महापालिका पाणीपुरवठा विभागप्रमुख अनिरुद्ध पावसकर यांनी अभियांत्रिकी महाविद्यालयास (सीओईपी) दिलेले आहेत. यानुसार बुधवार, दि.2 डिसेंबरला या टाक्यांची पाहणी संबंधित अधिकाऱ्यांच्या पथकाकडून करण्यात येणार आहे. जीर्ण टाक्यांची अवस्था गंभीर असून नव्या टाक्यांचे काम तातडीने महानगरपालिकेने सुरू करावे, याबाबतच्या सूचना आयुक्तांना खासदार वंदना चव्हाण यांनी केल्या आहेत. तर, यावर दुरवस्था झालेल्या टाक्यांचे सर्वेक्षण झालेले असून पुन्हा स्ट्रक्चरल ऑडिट करण्यात वेळ घालविण्यापेक्षा दुरुस्तीचे काम तातडीने सुरू करावे, अशी सूचना आमदार माधुरी मिसाळ यांनी केली आहे. दुर्घटनेची शक्यता गृहित धरता सदर काम तातडीने सुरू करण्याबाबत आता प्रशासनावर दबाव वाढू लागला असल्याचा संबंधित अधिकाऱ्यांनीही दुजोरा दिला आहे.
पर्वती येथील धोकादायक टाक्यांचे स्ट्रक्चरल ऑडिट महानगरपालिकेकडून केले जात आहे. टाक्यांची गंभीर अवस्था झाली असून या टाक्यांची दुरुस्ती करणे अथवा नव्या टाक्यांचे काम तातडीने करणे गरजेचे आहे. याबाबत गेल्या वर्षभरापासून पाठपुरावा करीत आहे. मात्र, महापालिकेच्या अधिकाऱ्यांकडून वेळोवेळी फक्त आश्वासने दिली गेली आहेत.
याकामी पालिकेकडून चालढकल केली जात आहे. नेमकी काय अडचण आहे? याबाबत अधिकारी बोलत नाहीत.
पाणीपुरवठा विभागप्रमुख अनिरुद्ध पावसकर यांच्याशी याबाबत चर्चा केली आहे. टाक्यांची मोठी दुरवस्था झाली असल्याने स्ट्रक्चरल ऑडिटमध्ये वेळ घालविण्यापेक्षा टाक्यांची तातडीने दुरुस्ती करण्याबाबत सूचना केल्या असल्याचे पर्वती मतदारसंघाच्या आमदार माधुरी मिसाळ यांनी सांगितले.
काम करता येत नसेल तर राजीनामे द्या…
शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या पाण्याच्या टाक्यांची इतकी गंभीर परिस्थिती असताना पालिका प्रशासन अद्याप निवांत कसे? या टाक्यांचे सर्वेक्षण झालेले असतानाही पाणीपुरवठा विभागाकडून याबाबत कोणतीही कार्यवाही का गेली नाही? पालिकामध्ये सत्ताधाऱ्यांना काम करता येत नसेल तर नैतिकतेने त्यांनी राजीनामे द्यावेत, अशी थेट मागणी महाराष्ट्र नवनिर्माण सेना पुणे शहर उपाध्यक्ष जयराज लांडगे यांनी केली आहे.
पर्वती येथील टाक्यांची इतकी दुरवस्था असताना तातडीने काम सुरू करणे गरजेचे आहे. पुणे महानगरपालिका नको त्या कामांवर एकीकडे कोट्यवधी रुपये खर्च करीत असेल तर दुसरीकडे पाण्यासारख्या महत्त्वाच्या प्रश्नावर काम रेंगाळ ठेवले जाते, ही प्रशासनाचे भूमिका चुकीची आहे. दुर्घटना घडल्यानंतर आणि लोकांचे जीव गेल्यावर पालिका निधी खर्च करणार का? असा सवाल करीत टाक्यांचे काम तातडीने सुरू झाले नाही तर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे आंदोलन केले जाईल, असा इशाराही उपाध्यक्ष लांडगे यांनी दिला आहे.
काही महिन्यांपूर्वी जनता वसाहतीत उलट्या व जुलाबाची साथ आली होती. लोकांना पाणी उकळून प्यायला सांगितल्यानंतर ही साथ कमी झाली. त्यानंतर स्थानिक नागरिकांकडून असे समजले की, पाण्याच्या टाकीमध्ये कुत्रे मरून पडले होते. ते लोकांनीच बाहेर काढले. स्वच्छ केलेले पाणी जर योग्य पद्धतीने साठवले जात नसेल तर त्यात घाण मिसळून आरोग्याचा प्रश्न निर्माण होणारच. जीर्ण पाण्याच्या टाक्या आरोग्यासाठीही अपायकारक ठरत आहेत.
– डॉ. रणजित निकम, जनता वसाहत
माझे घर पाण्याच्या टाकीजवळच असून टाक्यांची दुरवस्था झाल्याने पाणी खराब येते. टाक्या ओव्हर फ्लो होऊन पाणी पडण्यास सुरुवात झाली की, धडकी भरते. टाकीच्या चिरांमधून पाणी येऊन घर वाहून जाईल. या भीतीने रात्रभर झोप येत नाही, कायम मनात भीती राहते. गरिबीमुळे दुसरा पर्याय नाही. सरकारने या टाकीची लवकर दुरुस्ती करावी, एवढीच अपेक्षा आहे.
– केतन हरवडे, नागरिक