अरुण पवार
पाटण – पाटण तालुक्याला गेल्या वीस दिवसांपासून पावसाने चांगले झोडपून काढल्याने कोयना धरणही जलद गतीने भरले आहे. धरणात 85 टीएमसी पाणीसाठा झाला आहे. सध्या पावसाचा जोर कमी झाला असला, तरी अजूनही पुढे पावसाचे दिवस असल्याने पुन्हा पावसाचा जोर वाढल्यास धरणाचे दरवाजे उघडून पाणी सोडावे लागेल आहे. त्यामुळे तालुक्यात पुराचे संकट कायम आहे.
जुलैच्या मध्यावर सातत्याने अतिवृष्टी झाल्यामुळे पाटण तालुक्यासह कराडपर्यंत पूर परिस्थिती निर्माण झाल्याची चिन्हे दिसत होती. त्यामुळे पाटणचे आपत्ती व्यवस्थापन प्रशासन अलर्ट झाले होते. जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी त्यांनी देखील पाटणला धाव घेत परिस्थितीची पाहणी केली होती. परंतु, गेल्या दोन-तीन दिवसांपासून पावसाचा जोर एकदम कमी झाल्याने कोयना धरणात येणाऱ्या पाण्याची आवक मंदावली आहे. मात्र, आवक मंदावली असली, तरी धरण काठोकाठ भरण्यास जास्त वेळ लागणार नाही. तत्पूर्वी, धरणातील पाणीसाठा नियंत्रित ठेवण्यासाठी धरणाच्या पायथा वीज गृहातून 2100 क्युसेक पाणी सातत्याने नदीपात्रात सोडले जात आहे.
मागील काही वर्षांचा अनुभव लक्षात घेता येत्या गणपतीच्या सणापर्यंत पावसाचा जोर पुन्हा कधीही वाढू शकतो. त्यामुळे एकीकडे धरण भरल्यावर, दुसरीकडे मुसळधार पर्जन्यवृष्टी सुरू झाल्यास पाटण तालुक्यात पुन्हा पुर परिस्थिती निर्माण होऊ शकते. पावसाचा जोर सध्या कमी झाल्यामुळे सामान्य परिस्थिती आहे. शेतकरी वर्ग देखील शेतीच्या कामांमध्ये मग्न आहे. कोयना धरणापासून कराडपर्यंत नदीकाठच्या गावांवरील पुराचे संकट तात्पुरते टळले असल्यामुळे चिंता मिटली आहे.
2005 ते 06 साली गणपतीच्या सणातच मोठा महापूर आला होता. कोयना धरणातून एक लाख क्युसेक पाणी सोडावे लागले होते. त्यामुळे कोयना भागातील नदीकाठाच्या गावांना गणपती पलीकडे अन् लोक अलीकडे अशी स्थिती झाली होती. धरण पाणलोट क्षेत्रात नऊ ठिकाणी पर्जन्यमान मोठे असते. पूर्वेकडे उघडीप असली, तरी कोयना, महाबळेश्वर, नवजा, प्रतापगड, वळवण, कारगाव, सोनाट आदी. ठिकाणी सातत्याने पाऊस सुरु असतो. त्यामुळे धरणात येणाऱ्या पाण्याची आवक मोठ्या प्रमाणात सुरू असते.
दीडशे कुटुंबांचे तात्पुरते स्थलांतर टळले
गेल्या वीस दिवसांमध्ये जोरदार पाऊस पडल्यामुळे पूर परिस्थिती निर्माण झाली होती. या पार्श्वभूमीवर प्रशासनाने एनडीआरएफचे पथक सज्ज ठेवले होते. तसेच पाटण तालुक्यातील दीडशे कुटुंबांचे तात्पुरते स्थलांतर करण्याची तयारीही सुरु केली होती. धरणाचे दरवाजे न उघडता देखील नदीला पूर येवून केरा पुलाला पाणी टेकले होते. यामुळे पुन्हा तालुक्यात पावसाचा जोर वाढल्यास प्रशासनाला आपत्ती नियंत्रणाची पुन्हा तयारी करावी लागणार आहे.