कोयनानगर,(वार्ताहर) – कोयना धरणग्रस्तांच्या प्रलंबित मागण्यांसाठी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली पुनर्वसन प्राधिकरणाची बैठक मुंबईमध्ये मंत्रालयात मंगळवारी (दि. 5) घेण्यात येईल, असे पत्र प्रशासनाने दिल्याने, धरणग्रस्तांचा ‘लाँग मार्च’ स्थगित केल्याची माहिती श्रमिक मुक्ती दलाचे अध्यक्ष डॉ. भारत पाटणकर यांनी दिली.
कोयना धरणग्रस्तांचे प्रश्न सहा दशकांपासून रखडले आहेत. गतवर्षी कोयनानगर येथे केलेल्या ठिय्या आंदोलनाला पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी भेट दिली होती. मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत एका महिन्याच्या आत बैठक घेऊन, हे प्रश्न मार्गी लावण्याची ग्वाही त्यांनी दिली होती. त्यानंतर एक वर्ष उलटले तरी ही बैठक झाली नसल्याने धरणग्रस्तांनी पुन्हा आक्रमक पवित्रा घेतला.
त्यांनी डॉ. पाटणकर यांच्या नेतृत्वाखाली कोयनानगर येथील तीन मंदिर परिसरापासून काल (दि. 29 फेब्रुवारी) ‘लाँग मार्च’ सुरू केला होता. हा मार्च मरळी, ता. पाटण येथे पालकमंत्री शंभूराज देसाई यांच्या निवासस्थानापर्यंत काढण्यात येणार होता.
हा लाँग मार्च रासाटी येथे वन्यजीव विभागाच्या कार्यालयाजवळ आल्यावर, धरणग्रस्तांनी तेथे ठिय्या मारला होता. या मागण्यासंदर्भात पुनर्वसन प्राधिकरणाची बैठक मुंबईत मंत्रालयात मंगळवारी (दि. 5) घेण्यात येईल, असे पत्र प्रशासनाने दिले. त्यामुळे हा मार्च स्थगित केल्याची घोषणा डॉ. पाटणकर यांनी केली.
धरणग्रस्त युवक
धरणग्रस्त युवकांना महानिर्मिती कंपनीत 50 टक्के आरक्षण देऊन, नोकर्यांमध्ये सामावून घ्यावे, या मागणीसाठी महानिर्मिती कंपनीच्या विश्रामगृहासमोर बेमुदत उपोषण सुरू आहे. या प्रश्नावर खासदार उदयनराजे भोसले यांनी उपमुख्यमंत्री तथा ऊर्जा मंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र देऊन, बैठक घेण्याची मागणी केली आहे.