पुणे – निसर्ग चक्रीवादळ आणि अति पावसाचा जिल्ह्यातील 371 गावांना फटका बसला आहे. यामुळे पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. या पावसामुळे एकूण 7 हजार 874.42 हेक्टर क्षेत्राचे 33 टक्क्यांपेक्षा जास्त नुकसान झाले आहे. नुकसानीमुळे जिल्ह्यातील 28,496 शेतकऱ्यांना आर्थिक फटका बसला आहे. नजर अंदाज अहवालातून ही माहिती पुढे आली आहे.
नैसर्गिक आपत्तीमध्ये जिरायत क्षेत्रावरील पिकांचे नुकसान नसले, तरी बागायती क्षेत्रातील 7,874 हेक्टरवरील पिके आणि फळपिकांचे नुकसान झाले आहे. त्यासंदर्भात शासनाने तातडीने पंचनामे करण्याचे आदेश दिले आहेत.
मात्र, जिल्ह्यात पंचनामे सुरू झालेले नाही. पंचनामे झाल्यास या नुकसानीची नेमकी माहिती समोर येईल. त्यानंतर पंचनाम्याचा अहवाल शासनाला सादर करून नुकसान भरपाई देण्यात येईल, अशी माहिती कृषी विभागाच्या सूत्रांनी दिली. जिल्ह्यात उन्हाळी पिके व भाजीपाल्याचे मोठे क्षेत्र आहे.
कृषी विभागाच्या नजर अंदाज
अहवालामध्ये इंदापूर, जुन्नर, आंबेगाव, खेड, मावळ, मुळशी, शिरूर या तालुक्यांतील 371 गावांमध्ये पिकांचे नुकसान झाले असल्याचे समोर आले आहे. यामध्ये उन्हाळी बाजरी, कांदा, मका, द्राक्षे, डाळिंब पिकांचे मोठे नुकसान झाले आहे.