कोलकाता- “बुलबुल’ चक्रिवादळामुळे पश्चिम बंगालच्या किनारपट्टीच्या भागातील जनजीवन विस्कळीत झाले असून हे चक्रिवादळ आता बांगलादेशच्या बाजूने सरकले आहे. आतापर्यंत या चक्रिवादळामुळे 7 जण मरण पावले आहेत, असे अधिकाऱ्यांनी सांगितले.
चक्रिवादळामुळे किनारपट्टीच्या भागात मुसळधार पाऊस सुरू असून समुद्रही खवळलेला होता. ठिकठिकाणी झाडे कोसळली असून पश्चिम बंगालच्या उत्तर आणि दक्षिण 24 परगणा या जिल्ह्यांसह पूर्व मिदनापूरमध्ये तारा तुटल्यामुळे वीज पुरवठा आणि टेलिफोनचा संपर्क तुटला आहे. उत्तर परगणा या एकाच जिल्ह्यामध्ये वेगवेगळ्या घटनांमध्ये किमान 5 जण मरण पावले आहेत.
बुलबुल या चक्रीवादळामुळे आणि मुसळधार पावसामुळे या भागात निर्माण झालेल्या परिस्थितीचा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज आढावा घेतला. त्यांनी यासंदर्भात पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बनर्जी यांच्याशीही दूरध्वनीवरून चर्चा केली आणि केंद्र सरकारकडून आवश्यक ती सर्व मदत करण्याचे आश्वासन दिले.
पूर्बा मकला गावामध्ये अंगावर झाड पडून एका महिलेचा मृत्यू झाला. गोख्ना गावातही काही झाडे पडली आहेत. त्यामुळे आणखी एका महिलेचा मृत्यू झाला आहे. वीजेच्या खांबावरील जिवंत वीजप्रवाहाची तार अंगावर पडल्यामुळे 24 परगणा जिल्ह्यातील एक जण मरण पावला. तर अंगावर भिंत पडून दोघेजण मरण पावले.
शनिवारी हे चक्रिवादळ किनारपट्टीवर थडकले. त्यामुळे आलेल्या मुसळधार पावसामुळे आणि ताशी 135 किलोमीटर वेगाने वारे वाहत होते, त्यामुळे अनेक लोक घरामधून बाहेरही पडू शकले नाहीत. कोलकातामध्येही घरांच्या भिंती कोसळण्याच्या काही घटना घडल्या. नागरिकांना सुरक्षित ठिकाणी आश्रय घेण्याच्या सूचना प्रशासनाने केल्या होत्या.
पडलेली झाडे हटवण्यासाठी आणि आपत्तीत अडकलेल्या नागरिकांना सोडवण्यासाठी “एनडीआरएफ’, अग्निशामक दल, पोलिस आणि महापालिकेचे कर्मचारी कार्यरत आहेत. राज्य आपत्ती व्यवस्थापन विभागाने सर्व आपत्कालिन यंत्रना सक्रिय केली आहे. हवामान विभागाने दिलेल्या इशाऱ्यानुसार चक्रिवादळ सुंदरबन धांची येथे थडकल्यावर त्याचा जोर कमी होण्याची शक्यता आहे.