लेखिका तस्लिमा नासरिन यांचा अयोध्या निकालावरून सवाल
नवी दिल्ली : देशातील अतिशय संवेदनशील असणाऱ्या रामजन्मभूमी आणि बाबरी मशीद वादावर सर्वोच्च न्यायालयाने शनिवारी ऐतिहासिक निकाल दिला. अयोध्येतील वादग्रस्त जागेवर राम मंदिर बांधण्यात यावे तर मशीद बांधण्यासाठी वेगळी 5 एकर जमीन देण्यात यावी, असा निकाल सर्वोच्च न्यायालयाच्या घटनापीठाने दिला. या निकालाचे सर्वत्र स्वागत करण्यात आले. पण वादग्रस्त बंगाली लेखिका तस्लिमा नासरीन यांनी मात्र या निर्णयासंबंधात एक सवाल केला आहे.
2.77 acres of land for Hindus. 2.77 acres of land should be for Muslims. Why 5 acres for them?
— taslima nasreen (@taslimanasreen) November 9, 2019
प्रसिद्ध बंगाली लेखिका तस्लिमा नासरीन या नेहमीच आपल्या वादग्रस्त वक्तव्यांमुळे चर्चेत असतात. सध्या त्या अयोध्या प्रकरणी सर्वोच्च न्यायालयाच्या घटनापीठाने दिलेल्या निकालावरील ट्विटमुळे पुन्हा चर्चेत आल्या आहेत. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानुसार अयोध्येतील वादग्रस्त 2.77 एकर जागेवर राम मंदिर बांधण्यात यावे तर इतरत्र 5 एकर जागा मशीद बांधण्यासाठी द्यावी, असे निर्देश देण्यात आले. त्याबाबत बोलताना 2.77 एकर जमीन हिंदूंना मंदिरासाठी देण्यात आली आहे. तर मुस्लिमांनाही मशीदीसाठी 2.77 एकर जागा दिली जायला हवी होती. त्यांना 5 एकर जमीन का?, असा सवाल त्यांनी ट्विटच्या माध्यमातून केला.
दरम्यान, 3 महिन्याच्या कालावधीत एका ट्रस्टची स्थापना करून राम मंदिर बांधण्यात यावे, असाही निकाल सर्वोच्च न्यायालयाकडून देण्यात आला. सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश रंजन गोगोई, न्या. शरद बोबडे, न्या. धनंजय चंद्रचूड, न्या. अशोक भूषण आणि न्या. ए. अब्दुल नाझीर या पाच न्यायाधीशांच्या घटनापीठाने हा निकाल दिला.