परराष्ट्र धोरण म्हणजे “नेहरू धोरण’ नव्हे!
पंडितजींचे स्पष्टीकरण
नवी दिल्ली, ता. 9 – भारताचे परराष्ट्र धोरण म्हणजे “नेहरू धोरण’ आहे असे म्हणणे चूक आहे, असे पंतप्रधान पं. नेहरू यांनी आज लोकसभेत परराष्ट्र धोरणावरील चर्चेस उत्तर देताना स्पष्ट केले. श्री. जयपालसिंग यांनी काल परराष्ट्र धोरणास “नेहरू धोरण’ म्हणून संबोधले होते.
पंडितजी म्हणाले, भारताचे धोरण मी ठरवलेले नाही. धोरणाचा उद्घोष केला एवढेच! तटस्थ धोरणाचे समर्थन करून पंडितजींनी भारतीय परराष्ट्र धोरणाचा सर्वत्र प्रभाव पडल्याचे सांगितले.
समुद्राच्या पात्रात हिरे सापडले
ऑरेंज नदी – या नदीत मासेमारी करणाऱ्या पाणबुड्यांना अटलांटिकच्या पात्रात पाच कॅरेट वजनाचे
हिरे सापडले आहेत. या पाणबुड्यांना काम देणाऱ्या कंपनीचे म्हणणे असे आहे की, या पात्रात आणखी बरेच हिरे असावेत.
बालकांसाठी चित्रपट
मुंबई – मुलांना रुचतील व त्यांची निरामय करमणूक होईल असे चित्रपट काढणे आवश्यक आहे, असे राज्यपाल श्री. श्रीप्रकाश यांनी म्हटले आहे. चिल्ड्रेन फिल्म सोसायटीचा “स्काऊट कॅंप’ व “गंगा की लहरे’ या चित्रपटाचे उद्घाटन त्यांनी आज केले तेव्हा वरील उद्गार काढले.
सोसायटीच्या कामाची माहिती देताना सोसायटीचे अध्यक्ष श्री. रंगराव दिवाकर म्हणाले, “जलदीप’ या चित्रपटाला आंतरराष्ट्रीय बक्षीस मिळाले आहे. बेल्जियममध्ये हा चित्रपट दूरदर्शनवर दाखवण्यात येत आहे. गंगा की लहरे हा चित्रपट ऑस्ट्रेलियामध्ये दूरदर्शित करण्यात आला. श्री. पंत यांनी “चित्रपट रूप काव्ये’ असे गंगा की लहरे याचे वर्णन केले आहे.
कालवा पाण्याचा वाद भारताची भूमिका
नवी दिल्ली – भारत-पाकमधील कालवा पाण्याच्या वादासंबंधीच्या वाटाघाटी अनिर्णित काळापर्यंत लांबविण्याची इच्छा नाही, असे आज लोकसभेत पाटबंधारे खात्याचे उपमंत्री श्री. हाथी यांनी प्रश्नोत्तराचे वेळी स्पष्ट केले.