कराची – इम्रान खान यांची पाकिस्तानच्या पंतप्रधानपदावरून गच्छंती झाल्यावर तेथील 57 टक्के जनतेने आनंद व्यक्त केला आहे, असे एका सर्वेक्षणात आढळून आले आहे. या संदर्भात 10 आणि 11 एप्रिलदरम्यान गॉलअप सर्वे करण्यात आला होता. त्यामध्ये 1 हजार घरांशी संपर्क साधण्यात आला होता.
नागरिकांनी फोन कॉल आणि डिजीटल डायलिंगच्या माध्यमातून आपला अभिप्राय नोंदवला आहे. त्यामंध्ये 57 टक्के नागरिकांनी इम्रान खान यांच्या तेहरिक ए इन्साफ पार्टीचे सरकार पायउतार झाल्याबद्दल समाधान व्यक्त केले आहे.
यापैकी 71 टक्के लोकांनी सरकार बदलल्याबद्दल आनंद व्यक्त केला. इम्रान खान यांच्या सरकारमुळेच देशात महागाई आणि दारिद्रय वाढल्याचे त्यांनी म्हटले आहे. सध्या देशात दैनंदिन गरजांसाठी मोठा आर्थिक भार सोसावा लागतो आहे.
एवढेच नव्हे तर इम्रान खान यांच्या कार्यकाळात देशातील महागाईने शिखर गाठले आहे. देशाची चालू वित्तीय तूट जीडीपीच्या 6 टक्क्यांपर्यंत म्हणजेच 20 अब्ज डॉलरपर्यंत पोचल्याचे माजी अर्थमंत्री आणि अर्थतज्ञ डॉ. हाफिज ए. पाशा यांनी अलिकडेच म्हटले होते.