विजय लाड
कोयनानगर – कोयना धरणातील 30 टीएमसी पाणीसाठा पूर्वेकडील सिंचन प्रकल्पासाठी राखीव आहे. यामध्ये वाढ झाल्याने कोयनेतून पूर्वेकडे वाढीव पाणी सोडण्याची मागणी होत आहे. त्यामुळे पूर्वेकडील सिंचन व बिगरसिंचन प्रकल्पांना कोयना धरणातून आणखी 20 टीएमसी, म्हणजे एकूण 50 टीएमसी पाणी सोडण्यात यावे, असा प्रस्ताव जलसंपदा विभागाने शासनाला पाठवला आहे. या प्रस्तावाबाबत शासन सकारात्मक असून, पूर्वेकडील सिंचन प्रकल्पांसाठी लवकरच 50 टीएमसी पाणी मिळण्याची शक्यता आहे. कोयनेच्या पाण्यामुळे पूर्वेकडे हरितक्रांती होणार आहे.
कडक उन्हाळ्याचा फटका पूर्वेकडील शेतीला बसत आहे. कृष्णा काठावरील पाणी योजना उघड्या पडून, पिके करपू लागल्याने पाण्याची मागणी वाढली आहे. मागणीप्रमाणे पुरवठा करण्यास कोयना धरण व्यवस्थापन असमर्थ आहे. त्यात उजव्या तीरावर 40 मेगावॅटची दोन जनित्रे असलेल्या वीजगृहाला घरघर लागली आहे. या विद्युतगृहाची संकल्पित विसर्ग क्षमता 2400 क्युसेक आहे. सिंचनासाठी पाणी सोडताना आधी वीजनिर्मितीसाठी पाणी वापरले जाते. कोयनेचे एक थेंबही पाणी वाया जाऊ देऊ नये, असा आदेश आहे;
परंतु वीजनिर्मिती न करता वारेमाप पाणी कोयना धरण व्यवस्थापनाकडून विविध माध्यमातून सोडले जात आहे. सध्या पायथा वीजगृहातील 20 मेगावॅटच्या जनित्रात बिघाड झाला आहे. त्यामुळे एका युनिटमधून 1050 क्युसेक आणि धरणाचा आपत्कालीन विमोचक दरवाजा उघडून, एक हजार, अशा एकूण 2050 क्युसेक पाण्याचा विसर्ग होत आहे. पूर्वेकडील मागणी तीन हजार क्युसेकची आहे.
डाव्या तीरावरील वीजगृहाचे काम सुरू करणार
धरणाच्या डाव्या तीरावर उभारण्यात येत असलेल्या वीजगृहाला सुधारित प्रशासकीय मान्यता मिळाल्यानंतर 80 मेगावॅट क्षमतेच्या वीजगृहातून सिंचनासाठी दर पंधरवड्याला करावा लागणारा विसर्ग 97.43 घमीप्रसें असेल. त्याचबरोबर महाराष्ट्राच्या वाट्याला आलेल्या पाण्याचा पुरेपूर वापर करण्यासाठी विविध सिंचन प्रकल्प हाती घेण्यात आले आहेत. त्यात कृष्णा नदीवरील अनेक उपसा सिंचन योजनांचा सामावेश आहे. या सर्व प्रकल्पांसाठी कोयना धरणातून 50 टीएमसी पाणीसाठा उपलब्ध करण्याचे नियोजन आहे. डाव्या तीरावरील वीजगृहाचे काम सुरू करून, त्याची कार्यवाही होईल, असा विश्वास जलसंपदा विभागातील उच्चपदस्थ अधिकाऱ्यांनी व्यक्त केला.