कोलकता – ऐन निवडणुकीच्या काळातही पश्चिम बंगालमधील सत्तारूढ तृणमूल कॉंग्रेसला लागलेली गळती सुरूच आहे. त्या पक्षाच्या पाच आमदारांनी सोमवारी भाजपमध्ये प्रवेश केला.
तृणमूलने तिकीट नाकारल्याने पाच विद्यमान आमदारांनी पक्षबदल केला. याआधीही बऱ्याच आमदारांनी तृणमूलला रामराम ठोकत भाजपचा झेंडा हाती घेतला. ते सत्र विधानसभा निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाल्यानंतरही सुरूच राहिले. बंगालमध्ये 27 मार्च ते 29 एप्रिल या कालावधीत आठ टप्प्यांत मतदान होणार आहे. दरम्यान, माल्दा जिल्हा परिषदेची सत्ताही तृणमूलला गमवावी लागली. एकूण 37 पैकी 22 सदस्यांनी तृणमूलला सोडचिठ्ठी देऊन भाजपमध्ये प्रवेश केला. त्यामुळे ती जिल्हा परिषद भाजपच्या ताब्यात गेली. ती घडामोड भाजपचा उत्साह वाढवणारी आहे.