सीमा प्रश्नावर पुढील महिन्यात पुन्हा चळवळ
बेळगाव, दि. 24 – सध्या म्हैसूरमध्ये असलेला सीमाभाग महाराष्ट्रात विलीन करावा, म्हणून महाराष्ट्रीय लोक 21 नोव्हेंबरला चळवळ करणार असल्याची माहिती महाराष्ट्र विधान परिषदेचे उपसभापती रा. सु. गवई यांनी दिली. या चळवळीची हाक महाराष्ट्र एकीकरण समितीने दिली आहे. काल रात्री एका जाहीर सभेत बोलताना गवई म्हणाले, या चळवळीमुळे आम्ही आमचे ध्येय निश्चितच साध्य करू.
राष्ट्रीय नेतृत्व निर्माण करणारे शिक्षण विद्यापीठांनी द्यावे
तिरुपति – भारतातील विद्यापीठांनी विद्यार्थ्यांना केवळ नोकऱ्या मिळवून देणारे शिक्षण न देता राष्ट्रीय नेतृत्व स्वीकारू शकतील असे शिक्षण द्यावे, अशी सूचना तामीळनाडूचे राज्यपाल के. के. शाह यांनी वेंकटेश्वर विद्यापीठात बोलताना केली.
सबंध जगावर उपासमारीचे संकट?
वॉशिंग्टन – सबंध जगच आता उपासमारीच्या फेऱ्यांत सापडण्याचा धोका आहे मग धान्याचे उत्पादन यंदा कितीही चांगले झालेले असो, असे यूनोच्या अन्न व शेतकी संघटनेचे प्रमुख डॉ. बोर्मा यांनी जाहीर केले.
स्वंतत्र आदिवासी कल्याण विभागाची स्थापना
पुणे – महाराष्ट्रातील सुमारे 30 लक्षांवर असलेल्या आदिवासींच्या कल्याण कार्यक्रमासाठी शासनाने नुकतीच स्वतंत्र आदिवासी कल्याण विभागाची स्थापना केली आहे. यापुढे जिल्हापरिषदाकडे असलेला आदिवासी कल्याण कार्यक्रम या संचालनालयाच्या तांत्रिक माहितीखाली चालेल. संचालनालयाद्वारा आदिवासींची वैशिष्ट्ये राखण्यासाठी खास सांस्कृतिक अधिकाऱ्याकरवी त्यांचे रितीरिवाज, लोकगीते, लोकसाहित्य यांचे संकलन केले जाते.