जागतिक युद्ध भडकणार काय?
नवी दिल्ली, दि. 25 – चौथ्या राष्ट्रीय कॉंग्रेस अधिवेशनाला पाठविलेल्या संदेशात चीनचे पंतप्रधान चौएन् लाय यांनी असे भाकित केले आहे की, अमेरिका-रशिया संघर्षातून जागतिक युद्ध भडकेल. दोन देश अत्यंत जुलमी व पिळवणूक करणारे आहेत. सर्व देशाचे नागरिक युद्धासाठी तयार आहेत. चौथ्या भाकितात काळ वेळ नाही. हे युद्ध नजीकचे काळात अगर दुरवर आहे, याचा उल्लेख कोठे आढळत नाही. वास्तविक अतिपूर्वेच्या राष्ट्रांना खरोखरीच चीनच्या विस्तारवादाची भीती आहे.
महाराष्ट्राचे यंदाचे अन्नधान्य उद्दिष्ट साध्य झाले
मुंबई – यंदा महाराष्ट्रात 80 लाख टन अन्नधान्याचे उत्पादन होईल, असे मुख्यमंत्री नाईक यांनी प्रजासत्ताक दिनाच्या संदेशात म्हटले आहे. यंदा पीकपाणी चांगले होईल अशी मला आशा होती व ती खरी ठरली आहे. आपले धान्य उत्पादन उद्दिष्ट साध्य झाल्याने राज्याच्या इतिहासात महत्त्वाचे पाऊल उचलले गेले आहे.
व्ही. व्ही. गिरींना भारतरत्न, सी. डी. देशमुख-पद्मविभूषण
नवी दिल्ली – माजी राष्ट्रपती व्ही. व्ही. गिरी यांना भारतरत्न हा सर्व श्रेष्ठ किताब देण्यात आला आहे. आठ जणांना पद्मभूषण किताब देण्यात आला असून त्यात भारताचे माजी अर्थमंत्री सी. डी. देशमुख, त्यांच्या पत्नी दुर्गाबाई देशमुख, भाभा अणुकेंद्राचे डॉ. सेठना, डॉ. रामण्णा, सुप्रसिद्ध गायिका सुब्बालक्ष्मी यांचा समावेश आहे. दिवंगत गझल सम्राज्ञी बेगम अख्तर यांना मरणोत्तर पद्मभूषण किताब देण्यात आला आहे.
मुजीब यांनी बांगलादेशचे अध्यक्षपद स्वीकारले
डाक्का – बांगला देशचे पंतप्रधान शेख मुजीब उर रहमान यांनी बांगलादेशचे अध्यक्षपद स्वीकारले असून देशातील ही दुसरी क्रांतीच आहे, असे त्यांनी मत व्यक्त केले आहे. पार्लमेंटरी लोकशाही पद्धत नष्ट करून अध्यक्षीय प्रशासन व्यवस्था जारी करण्याचा ठराव पार्लमेंटांत एक उपसूचनेद्वारा मंजूर करण्यात आला.