देशातील भ्रष्टाचार नष्ट व्हावा ही श्रींची इच्छा
पुणे, दि. 31 – या देशातील भ्रष्टाचार, महागाई नष्ट व्हावी ही श्रींची इच्छा आहे म्हणून जयप्रकाश नारायण यांच्या हाती चळवळीचे नेतृत्व आले. त्यामुळे ही चळवळ नक्कीच यशस्वी होणार असे सांगून जगन्नाथराव जोशी म्हणाले, या आंदोलनात युवकांनी पुढाकार घ्यावा.
त्यासाठी पालकांनी युवकांना उत्स्फूर्त पाठिंबा दिला पाहिजे. बिहार संघर्ष सहाय्य समितीच्या युवक आघाडीतर्फे आज शिवाजी मंदिरात खासदार जोशी यांचे मार्गदर्शनभर भाषण आयोजित करण्यात
आले होते.
निवडणुकीसाठी तयार राहा
मद्रास – मतदार याद्या तयार करण्यासंबंधीचे काम वेगाने पूर्ण करा आणि निवडणुकांसाठी तयार राहा, अशी सूचना निवडणूक आयोगाने तामिळनाडू सरकारला दिली आहे, असे मुख्यमंत्री करुणानिधी यांनी येथे पत्रकारांशी बोलताना सांगितले.
इंदिराजी केव्हाही निवडणुका घेऊ शकतील
मद्रास – पंतप्रधान इंदिराजींना जर लोकमताचा कौल पुन्हा घ्यावासा वाटला तर मतदारांच्या याद्या अद्यावत नाहीत म्हणून त्या अडून बसणार नाहीत, असे कॉंग्रेसचे अध्यक्ष बारूआ म्हणाले. लोकशाहीत निवडणूक यंत्रणा सतत सज्ज असावीच लागते.
प्रतिगामी शक्तींना पुन्हा डोकं वर काढू देणे हा देशाचा घात ठरेल
सोलापूर – कॉंग्रेस कार्यकर्त्यांनी आपले दोष दूर करण्याचा प्रयत्न केला पाहिजे, या जयप्रकाश नारायण यांच्या मतांशी आम्ही सहमत आहोत, पण त्यांच्या भोवती जमा झालेल्या प्रतिगामी शक्तींना पुन्हा डोकं वर काढू देणे हा देशाचा घात ठरेल, असा इशारा गृहमंत्री रत्नाप्पा कुंभार यांनी दिला.
सोशलिस्ट पक्षाध्यक्षपदी पुन्हा फर्नांडिस
कोझिकोडे – सोशलिस्ट पक्षाच्या अध्यक्षपदी पुन्हा फर्नांडिस व सरचिटणीसपदी सुरेंद्र मोहन यांची आज फेरनिवड झाली.