…तेव्हा लोकशाही आत्महत्या करते!
अहमदाबाद, दि. 29 – संसदीय बहुमत जेव्हा मूलभूत तत्त्वे बाजूला सारते तेव्हा लोकशाही आत्महत्या करते, असे उद्गार लक्ष्मणशास्त्री जोशी यांनी काढले. लोकांचे स्वातंत्र्य संकुचित करणारे उपाय लोकांच्या ठिकाणी खरीखुरी जबाबदारीची जाणीव उत्पन्न करू शकतील का, असा प्रश्न उपस्थित करून तर्कतीर्थ म्हणाले, लेखन स्वातंत्र्य आणि प्रचारस्वातंत्र्य ही बाह्य बंधने होत.
त्यापासून लोकशाहीला योग्य असा नागरिक निर्माण होऊ शकेल काय? वास्तविक लोकांच्या ठिकाणी स्वातंत्र्यास मर्यादा घालण्याची वेळ न येता जबाबदारीची जाणीव उत्पन्न करण्याकरिता काय केले पाहिजे याचं चिंतन करणे आवश्यक आहे.
आपला उद्धार आपणच केला पाहिजे
पुणे- गोरगरीब, पददलित, शेतकरी, कामगार, बेकार, सुशिक्षित, विद्यार्थी यांच्या विकासाचे 20 कलमी आर्थिक कार्यक्रम पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी जाहीर केला आहे, त्याचा प्रसार परिषदा, मेळावे, सभांद्वारे प्रचार कार्य जोरदार सुरू आहे. मात्र, निद्रिस्त नैराश्याने ग्रस्त निर्जीव काही पुढाऱ्यांची हालचाल दिसून येत नाही.
कर्नाटक सरकारचे मंत्री आर. डी. कित्तूर यावेळी म्हणाले, ज्यांना त्याची आच नाही, गोरगरिबांच्या प्रश्नांना गती देण्याची आस्था नाही, असे लोक कॉंग्रेसमधील असोत किंवा इतर पक्षातील असोत ते या कामी पुढाकार घेणार नाहीत. आपणच सामान्यजनांचे दुःख दूर करण्यासाठी प्रयत्न केले पाहिजे.