गंगा पाणी वाटप करारावर अखेर डाक्क्यांत सह्या
डाक्का – गंगा पाणी वाटपाबाबत गेली 25 वर्षे जो वाद चालू होता तो आता भारत व बांगलादेश यांचे दरम्यान करार झाल्यामुळे मिटला आहे. आज येथे उभय देशांच्या प्रतिनिधींच्या सह्या करारावर करण्यात आल्या. त्यावेळी येथील परदेशी राजदूत मोठ्या प्रमाणावर हजर होते. या परदेशी राजदूतांत पाकिस्तान व चीन यांचे वकीलही हजर होते. भारताचे कृषी मंत्री बर्नाला व बांगला देशाचे अध्यक्षीय सल्लागार मंडळांचे सभासद ऍडमिरल खान यांनी करारावर सह्या केल्या. त्यावेळी हा करार “ऐतिहासिक’ महत्त्वाचा आहे, असे मत त्यांनी प्रदर्शित केले.
आर्थिक सत्तेचे विकेंद्रीकरण करणार
नवी दिल्ली – केंद्रीय गृहमंत्री चरणसिंग यांनी जनता पक्षाचे आर्थिक धोरण व तत्त्वज्ञान गांधीजींच्या तत्त्वावर कसे आधारलेले राहणार आहे ते दिग्दर्शित करणारे एक 120 पानाचे पुस्तक प्रसिद्ध केले आहे. त्यात ते म्हणतात, देशात आर्थिक सत्तेचे केंद्रीकरणास विरोध मग ते केंद्रीकरण एका व्यक्तीत असो किंवा सरकारांत असो, कोणत्याही प्रकारच्या शोषणास विरोध संपत्तीचे विस्तृत प्रमाणावर विकेंद्रीकरण व उत्पादन साधनांचे विकेंद्रीकरण या तत्त्वावर जनता पक्षाचे आर्थिक धोरण आधारलेले राहील. अर्थात हा मध्यम मार्ग आहे, असेही त्यांनी स्पष्ट केले.