– माधव विद्वांस
भारतीय स्वातंत्र्य चळवळीतील सशस्त्र क्रांतीच्या आद्य प्रवर्तकामधील एक नाव म्हणजे वासुदेव बळवंत फडके. त्यांचा जन्म 4 नोव्हेंबर 1845 रोजी रायगड जिल्ह्यातील कर्नाळा किल्ल्याजवळील शिरढोण येथे झाला. त्यांचे आजोबा अनंतराव कर्नाळा किल्ल्याचे किल्लेदार होते.
वासुदेव लहान असताना कर्नाळ्याच्या डोंगर उतारावर खेळण्यात त्यांचा वेळ जायचा. त्यांना वडिलांनी कौतुकाने बोकडाची गाडी घेऊन दिली होती. त्यावर स्वार होऊन ते फिरायचे. ही गाडी आजही त्यांच्या शिरढोण येथील स्मारकात पाहण्यास मिळते. सातव्या वर्षांपासून त्यांच्या शिक्षणास सुरुवात झाली. प्राथमिक शिक्षण शिरढोण येथेच पूर्ण झाले. पुढील इंग्रजी शिक्षण कल्याण, मुंबई, पुणे या ठिकाणी झाले. शिक्षणात फारसे लक्ष लागेना म्हणून त्यांनी शाळेला रामराम केला आणि पाचवीनंतर नोकरीला सुरुवात केली. पहिली नोकरी जीआयपी रेल्वेत केली. त्यांची रेल्वेमधली नोकरी सुटली व नंतर ते ग्रॅंट मेडिकल कॉलेजमध्ये लेखनिक म्हणून हजर झाले. पण ही नोकरीपण सुटली. अखेर 1863 मध्ये वासुदेव लष्कराच्या हिशेब खात्यात आले. मुंबईहून त्यांची बदली 1865 साली पुणे येथे झाली आणि पुणे हीच त्यांची कर्मभूमी ठरली.
पुणे येथे महादेव गोविंद रानडे व सार्वजनिक काका यांनी वर्ष 1871 मध्ये “सार्वजनिक सभे’ची स्थापना केली. त्यांच्या पुण्यातील सार्वजनिक सभेच्या कार्यकर्त्यांच्या ओळखी झाल्या. या सभेच्या बैठकीत रानडे यांची स्वदेशी चळवळीवरील भाषणे त्यांनी ऐकली. ही व्याख्याने आणि देशी वर्तमानपत्रांचा प्रचार यांनी वासुदेव क्रांतिकार्यात पडले. ते सार्वजनिक सभेच्या बैठकीत भाषण करू लागले. दरम्यान, महाराष्ट्रात प्लेग-पटकीसारख्या साथीच्या रोगांनी जनता त्रस्त होत होती. शेतकऱ्यांची दुष्काळामुळे मोठी परवड झाली. वासुदेवांनी पुणे, नगर, नाशिक या भागातील लोकांची अवस्था पाहिली. या सर्व गोष्टींची सरकारने योग्य प्रकारे काळजी घेतली नाही यावर ते ठाम झाले व या सरकारची हकालपट्टी करून आपल्या लोकांचे सरकार आले पाहिजे, असा प्रचार त्यांनी सुरू केला. सरकारविरोधात सर्वत्र उठाव व्हावेत, असे त्यांना वाटायचे.
त्यांनी लहुजी वस्ताद यांच्याकडून व्यायाम व तलवार, दांडपट्टा शिकण्यास सुरुवात केली. पुण्याजवळील लोणीकंद येथे बंडवाल्यांचे मुख्य कार्यालय स्थापन करण्यात आले. रामोशी लोकांच्या साथीने सावकार, सरकारी खजिने लुटण्यास सुरुवात केली. मोठी दहशत त्यांनी निर्माण केली. अखेर सरकारने त्यांना पकडण्यासाठी इनाम जाहीर केले. त्यांचा पाठलाग सुरू झाला. ते हुलकावण्या देत गोंदवले, अक्कलकोट भागात आले. तेथे खबऱ्यांमुळे ते पकडले गेले. त्यांच्यावर खटला चालवून अरबस्थानातील एडन येथे काळ्या पाण्याच्या शिक्षेसाठी पाठविण्यात आले. तेथे त्यांनी आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला तसेच तुरुंगाच्या दाराच्या बिजागिरी घासून घासून तोडल्या व पसार झाले. पण ते लगेचच सापडले. तुरुंगातील हाल, एडनची उष्ण हवा यांमुळे त्यांची प्रकृती बिघडली आणि क्षयरोगाने त्यांना पछाडले. त्यातच अखेरीस त्यांनी अन्नग्रहण सोडले. ते एडन येथील कारावासातच 17 फेब्रुवारी 1883 रोजी मरण पावले.