लखनौ : स्वतंत्र भारताचे पहिले पंतप्रधान पंडीत जवाहरलाल नेहरू यांचे पिढीजात घर असलेल्या “आनंदभवन’ला अलाहबाद महानगरपालिकेने 4.35 कोटी रुपयांची घरपट्टी आकारली आहे. महापौर अभिलषा गुप्ता “नंदी’ यांनी बुधवारी या वृत्ताचे समर्थन केले आहे. “आनंद भवन’ ही सेवाभावी संस्था असल्याचे सिद्ध करणारी कागदपत्रे संबंधित वास्तूच्या अधिकाऱ्यांकडून उपलब्ध केली जाऊ शकली नाहीत. म्हणूनच या घरपट्टी संदर्भातील नोटीस आठवड्याभरापूर्वी पाठवण्यात आली आहे, असे त्यांनी सांगितले.
“आनंद भवन’ला 4.35 कोटींच्या घरपट्टीची नोटीस बजावली आहे. ही इमारत चॅरिटेबल वास्तू म्हणून नोंदणीकृत आहे. मात्र चॅरिटेबल ट्रस्ट म्हणून आवश्यक असलेले कागदपत्रे मागितल्यावर ती उपलब्ध करून दिली जाऊ शकली नाहीत. ही इमारत देशाचा वारसा म्हणून सरकारकडे देण्यात आली आहे, असा अधिकाऱ्यांनीही दावा केला होता, असे महापौर म्हणाल्या.
“आनंद भवन’च्या अधिकाऱ्यांनी या घरपट्टीमध्ये सवलत देण्याची मागणीही केली आहे. मात्र ही सवलत का देण्यात यावी, याचे समर्थनीय कारणही हे अधिकारी देऊ शकलेले नाहीत. या कारणावरून कर भरण्यामुळे ही नोटीस बजावण्यात आली आहे.
ही इमारत चॅरिटेबल असल्याचे सांगितले गेले. मात्र इंदिरा गांधी यांच्या जयंतीदिनी भेट देणाऱ्यांकडून 50 रुपयांचे तिकीट वसूल केले गेले. म्युझियमसाठीही तिकीट लावले जात आहे. जर ही इमारत स्मरक म्हणून सरकारकडे सोपवली गेली असेल, तर इमारतीवर सरकारचे नियंत्रण हवे, असे महापौर म्हणाल्या.
“आनंद भवन’ने 1990 पर्यंत 600 रुपयांचा कर भरला आहे. मात्र त्यानंतर कर भरण्यात आलेला नाही, असेही महापौरांनी सांगितले. या संदर्भात कॉंग्रेस पक्षाकडून कोणतीही प्रतिक्रिया उपलब्ध होऊ शकली नाही.