पृथ्वीराज चव्हाणांचे संकेत; आणखी दोन दिवस चालणार चर्चा
नवी दिल्ली : शिवसेनेला पाठिंबा देऊन महाराष्ट्राला स्थिर सरकार स्थापनण्याकरीता कॉंग्रेस व राष्ट्रवादी कॉंग्रेस सकारात्मक असल्याचे संकेत कॉंग्रेस नेते माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी बुधवारी दिले. अजून दोन दिवस या कॉंग्रेस व राष्ट्रवादीमध्ये चर्चा होऊन महाराष्ट्रात लोकाभिमुख सरकार स्थापन होईल, असा विश्वास चव्हाण यांनी व्यक्त केला.
राज्यातील सत्तास्थापनेचा पेच मुंबईत सुटत नसल्याने आता सर्व राजकिय घडामोडींचा वेैंद्रबिंदू नवी दिल्लीकडे सरकला आहे. राज्यात शिवसेनेला पाठिंबा देऊन सत्ता स्थापन करण्यासाठी राष्ट्रवादी कॉग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी सोमवारी कॉग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांची 10 जनपथ निवासस्थानी भेट घेऊन चर्चा केली. त्यानंतर बुधवारी कॉंग्रेस व राष्ट्रवादीच्या नेत्यांची अध्यक्ष शरद पवार यांच्या दिल्लीतील निवासस्थानी बैठक झाली.
दोन्ही पक्षांच्या नेत्यांमध्ये प्रदीर्घ चर्चा झाली. त्यानंतर कॉंग्रेस नेते व माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण व राष्ट्रवादीचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी पत्रकारांशी संवाद साधला. महाराष्ट्रात गेल्या काहि दिवसांपासून जी अस्थिरता आहे ती संपवण्याकरीता आणि महाराष्ट्राला स्थिर सरकार देण्याकरीता कॉंग्रेस व राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये प्रदीर्घ चर्चा झाली. ही चर्चा अतिशय सकारात्मक होती. चर्चा अजून चालू आहे.
लवकरात लवकर आज विैंवा उद्या ही चर्चा चालू राहणार आहे. मला खात्री आहे कि महाराष्ट्रात लवकरात लवकर स्थिर आणि लोकाभिमुख सरकार स्थापन होईल आणि गेल्या काही दिवसांपासून सुरु असलेली अस्थिरता संपूष्टात येईल, असा विश्वास पृथ्वीराज चव्हाण यांनी व्यक्त केला.
सरकार स्थापन करण्याबाबत सर्व पैलूंवर चर्चा सुरु आहे, आणि त्यासंदर्भात सकारात्मक वातावरण आहे. चर्चा जशी संपेल तेव्हा आपणास विस्तारीतपणे माहिती दिली जाईल, असेही चव्हाण म्हणाले.
तीन्ही पक्षांशिवाय सरकार स्थापन होऊ शकत नाही – नवाब मलिक
महाराष्ट्रात सरकार स्थापन झाले नसल्याने प्रशासन ठप्प आहे. अवकाळी पावसाने नुकसान झालेल्या शेतकछयांना तातडीने मदत मिळायला हवी. त्यामुळे राज्यात सरकार स्थापन व्हायला हवे. त्यासाठी प्रयत्न सुरु आहेत. कॉंग्रेस व राष्ट्रवादीच्या नेत्यांमध्ये चर्चा सुरु आहे आणि पर्यायी सरकार स्थापन करण्यासाठी आम्ही सर्व बाबींवर चर्चा केली. आमच्या मित्रपक्षांबरोबर चर्चा केल्याशिवाय सरकार स्थापन होऊ शकत नाही, असे स्पष्ट करतानाच कॉंग्रेस, राष्ट्रवादी व शिवसेना एकत्र आल्याशिवाय पर्यायी सरकार स्थापन होऊ शकत नाही, असे राष्ट्रवादीचे प्रवक्ते नवाब मलिक म्हणाले. महाराष्ट्रात निश्चितच स्थिर सरकार स्थापन होईल आणि हे सरकार पाच वर्षे चालेल, असा दावाही त्यांनी केला.