कोलकाता – विधानसभेची निवडणूक होत असलेली चार राज्ये आणि पाच केंद्रशासित प्रदेशांमधून खर्चाच्या मर्यादेवरील देखरेख प्रक्रियेंतर्गत 331 कोटी रुपये जप्त करण्यात आले आहेत, अशी माहिती केंद्रीय निवडणूक आयोगाने दिली आहे. या राज्यांमध्ये अद्याप मतदान प्रक्रिया सुरू झालेली नाही, तरिही ही रक्कम जप्त करण्यात आली आहे, असे निवडणूक आयोगाने प्रासिद्धीस दिलेल्या निवेदनात म्हटले आहे.
यापूर्वी 2016 मध्ये केंद्रीय निवडणूक आयोगाने 225.77 कोटी रुपयांची रक्कम जप्त केली होती. त्या रकमेला या वर्षीच्या विधानसभेच्या निवडणूकीच्यावेळी मागे टाकले गेले आहे. आसाममध्ये 63.75 कोटी रुपये आणि 27.09 कोटी रुपयांचे ड्रग्ज जप्त केले गेले. पश्चिम बंगालमध्ये 47.70 कोटी रुपयांचे ड्रग्ज आणि एकूण 112.59 कोटी रुपये जप्त केले गेले.
तामीळनाडू, केरळ आणि पुद्दुचेरीमध्ये अनुक्रमे 61.04 कोटी, 15.23 कोटी आणि 2.85 कोटी रुपयांचे सोने जप्त करण्यात आले असल्याचे निवडणूक आयोगाने म्हटले आहे. तर एकूण जप्त केलेली रक्कम केरळमध्ये 21.77 कोटी, तामीळनाडूमध्ये 127.64 कोटी रुपयांची रक्कम जप्त केली गेली असल्याचेही निवडणूक आयोगाने म्हटले आहे.