बिजापूर – छत्तिसगढमध्ये शनिवारी सुरक्षा दलांनी ३ नक्षलवाद्यांचा खात्मा केला. ठार झालेल्या नक्षलींमध्ये २ महिला सदस्यांचा समावेश आहे. ती चकमक बिजापूर जिल्ह्यातील जंगलात झाली.
काही म्होरक्यांसह नक्षलवाद्यांच्या गटाचे अस्तित्व संबंधित जंगलात असल्याची माहिती गुप्तचरांनी सुरक्षा दलांना दिली. त्यानंतर राज्य पोलिसांचे डीआरजी पथक आणि सीआरपीएफच्या कोब्रा पथकाने विशेष मोहीम हाती घेतली.
जंगलात दडलेल्या नक्षलवाद्यांनी सुरक्षा जवानांना पाहून गोळीबार सुरू केला. त्याला सुरक्षा पथकांनी प्रत्युत्तर दिल्याने दोन्ही बाजूंमध्ये चकमक झडली. नक्षलींच्या बाजूने होणारा गोळीबार थांबल्यानंतर सुरक्षा पथकांनी परिसरात पाहणी केली. त्यावेळी नक्षलींचे मृतदेह आढळले.
त्यांच्याकडील शस्त्रास्त्रे आणि दारूगोळा साठा जप्त करण्यात आला. चकमकीत मारल्या गेलेल्या नक्षलींची ओळख तातडीने पटू शकली नाही. त्यांच्या साथीदारांनी चकमकीवेळी पलायन केले असण्याची शक्यता आहे.
त्यामुळे ते जंगलातच दडले असण्याच्या शक्यतेने सुरक्षा दलांनी लगतच्या परिसरात शोधमोहीम सुरू ठेवली. ती पुढील काही दिवस चालू राहण्याचा अंदाज सुत्रांनी व्यक्त केला.