मुंबई : नक्षलग्रस्त गडचिरोली जिल्ह्यात नक्षलवाद्यांविरोधात राबण्यात येणाऱ्या अभियानाला पोलिसांना 13 नोव्हेंबर रोजी मोठं यश मिळालं आहे. गडचिरोलीतील उत्तर-पूर्व भागातील छत्तीसगड सीमेजवळच्या परिसरात सुरू असलेल्या चकमकीत तब्बल २६ नक्षलवाद्यांना कंठस्नान घालण्यात पोलिसांना यश आलं. जिल्ह्यातील ग्यारापत्तीच्या जंगलात माओवाद्यांच्या विरोधात पोलिसांनी केलेल्या कारवाईची गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी प्रशंसा केली.
ही कारवाई राज्याच्याच नव्हे तर देशाच्या इतिहासातील उल्लेखनीय कामगिरी ठरली आहे. राज्याच्या सुरक्षेच्या दृष्टीने ही कारवाई अत्यंत महत्त्वाची आहे. या कारवाईत 26 नक्षलवाद्यांना पोलिसांनी कंठस्नान घातले. तसेच मोठ्या प्रमाणात शस्त्रसाठा जप्त करण्यात पोलिसांना यश आले आहे. नक्षलवाद्यांविरोधात करण्यात आलेल्या या कारवाईत पोलिस दलाचे तीन जवान जखमी झाले आहेत. त्यांच्यावर उपचार सुरू असून त्यांची प्रकृती स्थिर आहे.
नक्षलवादाचा मुकाबला करण्यासाठी कार्यरत असलेल्या सी-60 दलाने मिळालेल्या माहितीआधारे पोलिस अधीक्षक अंकित गोयल यांच्या मार्गदर्शनाखाली अपर पोलीस अधीक्षक सोमय मुंडे आणि त्यांच्या टीमने ही कारवाई केली. या कामगिरीबद्दल महाराष्ट्र विशेषतः गडचिरोली पोलिसांचे गृहमंत्र्यांनी मनपूर्वक अभिनंदन केले आहे.
या कारवाईमुळे सोमय मुंडे आणि त्यांच्या टीमवर कौतुकाचा वर्षाव होत आहे. अशावेळी सोमय मुंडे यांचा आयपीएस बनण्यापर्यंतचा त्यांचा प्रवास कसा राहिला? याबाबत सोशल मीडियावर चर्चा रंगली आहे. हा प्रवास सोमय मुंडे यांनीच एका कार्यक्रमात सांगितला होता.
नांदेडच्या देगलूर येथे सोमय मुंडे यांचा जन्म झाला. मुंडे यांनी त्यांचे प्राथमिक शिक्षण देगलूरमधीलच साधना हायस्कुलमध्ये पूर्ण केले. तसेच त्या पुढील शिक्षण त्यांनी सातारा सैनिक स्कुलमधून आणि राष्ट्रीय मिलटरी कॉलेज, देहरादूर येथे पूर्ण केले.
त्यापुढील शिक्षण शिक्षण त्यांनी आयआयटी मुंबई येथे पूर्ण केले. आयआयटीचे शिक्षण पूर्ण झाल्या नंतर ते यूपीएससीकडे वळाले. यूपीएससी चा मार्ग निवडण्या आधी आयआयटी असतांना त्यांनी यूपीएससी का करावी ? आयपीएसचं का व्हावे या मागील गोष्टींचा त्यांनी उलघडा एक कार्यक्रमात केला आहे.
त्यांनी आपल्या करिअर निवडीबाबत सांगितले की,’ जेव्हा मी लास्ट इयर ला होतो तेव्हा माझं भविष्या बाबत मी सतत विचार करत होतो. कॉलेज संपले की 9 ते 5 कम्प्यूटरसमोर काम करतात. एका चौकटीत राहूनच काम करावं लागेल. सॅलरी जर भर भक्कम असली तरी सुद्धा त्या कामातून समाधान मिळणार नाही.
आणि त्याच दरम्यान, 2008 मध्ये मी कॉलेजला असतांना मुंबईमध्ये अतिरेकी हल्ला झाला होता 26/11 चा, संपूर्ण मुंबईला या 10 अतिरेक्यांनी वेठीस धरलं होतं. त्यावेळी कॉलेजच्या माझ्या काही मित्रांना या घटनेवर काहीच वाटत नव्हते मात्र मला त्या दिवशी वाटले की, आपण समाजात राहत असतांना आपल्याच समाजात कितीतरी प्रॉब्लेम आहेत. बेरोजगारी, गरीबी, अतिरेकी हल्ले सुद्धा.
तेव्हा असा पण विचार मनात आला की या प्रॉब्लेम सोबत फाईट करायची इच्छा असेल तर सिस्टीममध्ये जाव लागेल आणि माझे प्राथमिक शिक्षण सैनिक स्कुलमध्ये पूर्ण झाल्या मुळे लहान पणापासून मला युनिफॉर्मची आवड होतीच तेव्हा एक निर्णय घेतला. की यूपीएससीद्वारे आयपीएसचं एक शिखर गाठायचे. पुढे अभ्यास सुरु केला न यूपीएससी परीक्षेच्या पॅटर्न नुसार प्रिलिम क्लिअर केली. मेन्सची परीक्षा दिली, मेन्सपण क्लिअर केली. मुलाखतीसाठी कॉल आला मात्र हे यश मिळवणे इतके सोपे नव्हते अनेकदा अपयश आले पण तुम्ही जर जिद्दीने काम करत असाल तर ‘तुमच्या यशानं वा अपयशानं जगाला जास्त फरक पडत नाही’ हे मला यूपीएससीच्या अभ्यास करतांना तसेच यश मिळाल्यावर कळले.