मुंबई – राज्यात सुमारे 25 हजार उद्योजक घडविण्याचे उद्दिष्ट असून यातून 75 हजार तरुणांना रोजगाराची संधी मिळणार आहे, असे उद्योगमंत्री उदय सामंत यांनी पत्रकार परिषदेत सांगितले. उदय सामंत म्हणाले, राज्यातील तरुणांच्या हाताला काम मिळावे.
तसेच त्याद्वारे नवउद्यमी घडविण्यासाठी स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त राज्य शासनाने मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रमाची व्याप्ती वाढविण्याचा निर्णय घेतला आहे. या योजनेद्वारे कर्ज देण्यासाठी जिल्हा बॅंकांचाही समावेश करण्यात आला आहे. या योजनेसाठी 2022 ते 2023 वर्षामध्ये 550 कोटींची तरतूद करण्यात आली आहे.
या योजनेत पूर्वी अनुसूचित जाती, जमाती, महिला, दिव्यांग आदींचा समावेश होता. आता इतर मागास वर्ग, भटके विमुक्त, अल्पसंख्याक आदी घटकांचा या योजनेत समावेश करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. आर्थिकदृष्ट्या मागास असलेल्या घटकांचाही या योजनेत समावेश करण्यात येईल.
मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रम राबविण्यासाठी राष्ट्रीय बॅंकांद्वारे कर्ज वितरित करण्यात येत होते. आता यापुढे जिल्हा बॅंकाद्वारे तरुणांना कर्ज मिळणार आहे. याबाबतचे शासनादेश पारित करण्यात येतील, असे त्यांनी स्पष्ट केले.
केंद्र सरकारच्या मदतीने राज्यात 2280 कोटींचे अन्न प्रक्रिया प्रकल्प उभारले जाणार आहे. हे प्रकल्प खासगी जागांवर होणार असून त्यासाठी शासन नियमांप्रमाणे प्रोत्साहने देणार आहे. याद्वारे 25 हजार रोजगार निर्माण होतील, असे सामंत म्हणाले.