नवी दिल्ली – 15 नोव्हेंबरपर्यंत मिळालेल्या माहितीनुसार भारतात साखर उत्पादनात 24 टक्के वाढ होऊन 21 लाख टन साखरेचे उत्पादन झाले आहे. साखरेचे उत्पादन वाढत असल्यामुळे साखरेची निर्यातही वाढत असून 25 लाख टन साखर निर्यात करण्याचे कॉन्ट्रॅक्ट झाले असल्याची माहिती साखर उत्पादकाच्या संघटनेने दिली आहे.
महाराष्ट्र आणि कर्नाटकसह दक्षिणेतील राज्यात गाळप लवकर सुरू झाल्यामुळे साखरेचे उत्पादन वाढले असल्याचे दिसून येते. गेल्या वर्षी आतापर्यंत महाराष्ट्रात 6 लाख टन साखरेचे उत्पादन झाले होते. या वर्षी मात्र त्यामध्ये वाढ होऊन 8 लाख 91 हजार टन साखरेचे उत्पादन झाले आहे.
उत्तर प्रदेशात मात्र पावसामुळे साखरेचे उत्पादन सुरू होण्यास थोडा वेळ लागला आहे. आगामी काळामध्ये उत्तरप्रदेशातील साखरेचे उत्पादनही वाढण्याची शक्यता आहे. त्याचबरोबर साखरेची निर्यातही वाढण्याची शक्यता असून 25 लाख टन साखरेच्या निर्यातीचे व्यवहार झाले असून त्यापैकी 2.7 लाख टन साखर प्रत्यक्षात परदेशात पाठविण्यात आली आहे.