संतोष पवार
सातारा – चेहऱ्यावर मास्क न वापरणाऱ्यांविरोधात दंडात्मक कारवाईचे जिल्हाधिकारी शेखर सिंह यांच्या आदेशानंतर सात महिन्यात सर्वत्र कारवायांचा धडाका सुरु आहे. या कारवायांमुळे करोना नियंत्रण आणण्यात काही अंशी यश आले आहे. जिल्ह्यातील 822 ग्रामपंचायतींनी 24 लाख 42 हजार 611 रुपयांचा दंड वसूल केला आहे. कोरेगाव तालुक्यात 103 ग्रामपंचायतींनी पाच लाख 43 हजार 830 रुपये सर्वाधिक दंड वसूल केला आहे, अशी माहिती जिल्हा परिषदेचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी अविनाश फडतरे यांनी दिली.
करोनाचे संकट गडद होऊ लागल्यानंतर एप्रिलपासून मास्क न वापरणाऱ्यांविरोधात कारवाईची मोहीम सुरु झाली. सार्वजनिक ठिकाणी वावरताना चेहऱ्यावर मास्क न वापरणाऱ्यांवर ग्रामपंचायत, नगरपालिका दंडात्मक कारवाई करत आहे. सात महिन्यांत सर्वत्र कारवाई होत आल्याने मास्क वापर गरजेचा असल्याची जाणीव नागरिकांमध्ये झाली. चेहऱ्यावर मास्क, सॅनिटायझर आणि सोशल डिस्टन्सिंग ही त्रिसुत्रीच पाळल्याने डिसेंबरपर्यंत करोना काही प्रमाणात नियंत्रणात आला.
मास्क न वापरल्याबद्दल झालेल्या कारवाईचा तपशील पुढीलप्रमाणे आहे. तालुकावार ग्रामपंचायती व कंसात दंडाची रक्कम याप्रमाणे. जावळी 40 ग्रामपंचायती (81 हजार 440 रुपये), कराड 53 ग्रामपंचायती (तीन लाख दोन हजार 450 रुपये), खंडाळा 54 ग्रामपंचायती (एक लाख एक हजार 504 रुपये), खटाव 81 ग्रामपंचायती (एक लाख 86 हजार 100 रुपये), कोरेगाव 103 ग्रामपंचायती (चार लाख 79 हजार 680 रुपये), महाबळेश्वर 9 ग्रामपंचायती (36 हजार 200 रुपये), माण 108 ग्रामपंचायती (दोन लाख 26 हजार 153 रुपये)
पाटण 113 ग्रामपंचायती (एक लाख 96 हजार 919 रुपये), फलटण 70 ग्रामपंचायती (एक लाख 90 हजार 216 रुपये), सातारा 143 ग्रामपंचायती (तीन लाख 50 हजार 963 रुपये), वाई 48 ग्रामपंचायती (एक लाख 34 हजार 356 रुपये) असा 822 ग्रामपंचायतींनी 22 लाख 85 हजार 981 रुपयांचा दंड वसूल केला आहे. सार्वजनिक ठिकाणी मास्क न वापरणे, होम क्वारंटाइनचे नियम न पाळणे अशा कारवायातून 23 लाख 74 हजार 326 रुपयांचा दंड वसूल झाला आहे.
दुकानांमध्ये पाचपेक्षा अधिक व्यक्ती पहिल्यांदा आढळून आल्याने 61 हजार 620 रुपये दंड वसूल करण्यात आला. त्यात जावळी तालुका सात हजार, कराड सहा हजार 70 रुपये, खंडाळा एक हजार रुपये, खटाव तीन हजार 200 रुपये, कोरेगाव 26 हजार 350, फलटण दीड हजार रुपये, सातारा साडेतीन हजार रुपये, वाई तालुक्यात अडीच हजार रुपये दंड वसूल झाला. पाचपेक्षा अधिक व्यक्ती दुकानांमध्ये दुसऱ्यांदा आढळून आल्यास 27 हजार रुपये दंड वसूल करण्यात आला. होम क्वारंटाइन आदेशाचे उल्लंघन करणाऱ्यांकडून आतापर्यंत 50 हजार 109 रुपयांचा दंड वसूल झाला. सार्वजनिक ठिकाणी थुंकणारांकडून 17 हजार 901 रुपये दंड वसूल करण्यात आला आहे. विविध प्रकारच्या दंडात्मक कारवाईतून 24 लाख 42 हजार 611 रुपयांचा दंड वसूल केल्याची माहिती फडतरे यांनी दिली.
जिल्ह्यात करोनाला रोखण्यासाठी जिल्हाधिकारी शेखर सिंह, मुख्य कार्यकारी अधिकारी विनय गौडा यांच्या मार्गदर्शनाखाली विविध उपाययोजना करण्यात येत आहेत. मास्क, सॅनिटायझर आणि सोशल डिस्टन्सिंग या त्रिसुत्रीचे महत्व लोकांना पटवून दिले. मास्क न वापरणाऱ्यांवर कारवाईची मोहीम प्रभावीपणे राबवण्यात आली. यातून अनेक नागरिकांना मास्क वापरण्याची सवय लागली. याचा चांगला फायदा झाला. डिसेंबरमध्ये जिल्ह्यात बाधित आणि मृृत्यूचे प्रमाण घटले आहे. अद्याप करोनाचा धोका संपला नसून नागरिकांनी प्रशासनाच्या सूचनांचे काटेकोर पालन करणे गरजेचे आहे.
– अविनाश फडतरे (उपमुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद, सातारा)