नगर – जिल्ह्यात 223 पूरप्रवण गावे असून, पूर नैसर्गिक आपत्तीदरम्यान शोध व बचाव कार्य करण्यासाठी जिल्ह्यातील 500 आपदा मित्रांना, तसेच पोलिसांना एनडीआरएफ पथकाद्वारे प्रशिक्षण देण्यात आले आहे. जिल्ह्यात 7 बोटी उपलब्ध करण्यात आल्या आहेत. यामध्ये दोन फायर बोटींचा समावेश आहे. पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर आपत्ती व्यवस्थापनाची मान्सूनपूर्व तयारी जिल्ह्यात पूर्ण झाली आहे. जून ते ऑक्टोबर या कालावधीत पावसाळा असतो. गोदावरी, प्रवरा, मुळा, भीमा, घोड, सीना, खैरी, म्हाळुंगी आदी नद्यांच्या पात्रावर 223 पूरप्रवण गावे वसलेली आहेत.
अतिवृष्टी, धरणांतून सोडलेला विसर्ग, धरणांचा फुगवटा, नदीपात्रातील आणि पूररेषेत वसलेल्या लोकांचा स्थलांतरास विरोध आदी कारणांमुळे पूर परिस्थिती निर्माण होते. त्यामुळे गावांना पुराचा वेढा पडतो. अशा वेळी जनतेला बाहेर काढणे, नदीपात्रातून वाहून गेलेल्या व्यक्तींचा शोध घेणे व त्यांचा बचाव करण्यासाठी आपत्ती व्यवस्थापनाकडून नियोजन केले जात आहे.
नांदूर मधमेश्वर, खडकवासला, चासकमान, घोड, मुळा, भंडारदरा धरणातून मोठ्या प्रमाणात विसर्ग सोडला जातो. उजनी, जायकवाडी धरणांतील फुगवट्यामुळे पूरपरिस्थिती निर्माण होत आहे. अशा वेळी उद्भवणाऱ्या आपत्कालीन परिस्थितीवर मात करण्यासाठी जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाकडून मान्सूनपूर्व तयारी केली जात आहे. सात तालुक्यांतील शाळा व महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसाठी आपत्ती व्यवस्थापनाबाबत जनाजागृती करण्यात आली आहे. गोदावरी नदीच्या पुरामुळे कोपरगाव शहरात मोठ्या प्रमाणात पाणी शिरते. त्यामुळे खबरदारी म्हणून कोपरगाव तहसीलदारांनी बोट चालविण्याचे प्रशिक्षण तरुणांना दिले आहे.
जिल्ह्यातील दैनंदिन पर्जन्याची माहिती उपलब्ध होण्यासाठी महावेद प्रकल्पांतर्गत 97 महसूल मंडलांत स्वयंचलित हवामान केंद्र कार्यान्वित केली आहेत. जिल्हाधिकारी नियंत्रण कक्ष 24 कार्यान्वित करण्यात आले असून, जनतेसाठी 1077 हा टोल फ्री क्रमांक उपलब्ध केला आहे.
या तालुक्यांना मिळाल्या बोटी…
महापालिका-1, पोलीस प्रशासन-1, कोपरगाव नगरपालिका-1, नेवासा तहसीलदार-1, श्रीगोंदा तहसीलदार-1, सिद्धटेक (कर्जत) -1 बोट देण्यात आल्याचे आपत्ती अधिकारी डॉ. वीरेंद्र बडदे यांनी सांगितले.
पूरप्रवण गावांची संख्या
गोदावरी-40, प्रवरा-100, मुळा-24, भीमा- 20, घोड- 11, सीना- 20, खैरी-5, म्हाळुंगी- 3 असे पूरप्रवण गावांची संख्या आहे.