पुणे, दि. 11 -प्रामाणिकपणे मिळकतकर भरणाऱ्यांना अपघात झाल्यानंतर मदत मिळावी, या उद्देशाने महापालिका 2018-19 पासून पंडित दीनदयाळ अपघात विमा योजना राबवत आहे. योजनेअंतर्गत महापालिकेने 2018-19 ते 2022-23 या चार वर्षांसाठी तब्बल 19 कोटी 66 लाख रुपये महापालिकेने विमा कंपनीला मोजले आहेत. याद्वारे आतापर्यंत केवळ 105 जणांना लाभ मिळाला असून, विमा रकमेपोटे 4 कोटी 54 लाख रुपयांचा परतावा मिळाला. त्यामुळे ही योजना नेमक्या कोणाच्या फायद्याची, असा सवाल उपस्थित केला जाऊ लागला आहे.
या विमा योजनेच्या आधार घेऊन महापालिकेची शहरी गरीब योजनाही विमा कंपन्यांच्या ताब्यात देण्यासाठी प्रयत्न सुरू असल्याचे बोलले जात आहे. त्यामुळे नागरिकांच्या लाभाखाली विमा कंपनीच्या घशात पुणेकरांचे पैसे घातले जात असल्याचे प्राथमिक चित्र आहे. प्रामाणिकपणे कर भरणाऱ्या मिळकतधारकाचा अपघाती मृत्यू झाल्यास त्यांच्या कुटुंबीयांना विमा योजनेअंतर्गत पाच लाख रुपयांचे अर्थसहाय्य मिळेल, असा या योजनेमागील उद्देश आहे. या योजनेअंतर्गत कर आकारणी झालेल्या मिळकतधारकांचा ग्रुप विमा काढण्यात येतो. दरवर्षी विमा कंपनीला कोट्यवधी रुपये प्रीमियम भरण्यात येतो. या योजनेत मिळकत धारकासोबत त्यांच्या कुटुंबीयांचाही समावेश करण्यात आला.
लाभार्थींची संख्या नगण्य
शहरात दरवर्षी सुमारे 7 ते 8 लाख मिळकतधारक नियमित कर भरतात. मात्र, त्या तुलनेत या योजनेचा लाभ घेणाऱ्या लाभार्थींची संख्या अतिशय नगण्य आहे. या योजनेचा आतापर्यंत पाच वर्षांत केवळ 104 लाभार्थ्यांना 4 कोटी 36 लाख 80 हजार रुपयांचा लाभ मिळाला आहे. विशेष म्हणजे ही अपघात विमा योजना आहे. मात्र शहरात करोनाचे लॉकडाऊन असलेल्या 2019-20 आणि 2020-21 या दोन वर्षात अनुक्रमे 47 आणि 43 असा 90 जणांना या योजनेला लाभ मिळाला असून, उर्वरित तीन वर्षांत अवघ्या 14 जणांना या योजनेचा लाभ मिळाला आहे. तर या चालू आर्थिक वर्षाच्या पहिल्या सहा महिन्यांत आतापर्यंत 2 जणांना लाभ मिळाला आहे.