पुणे, दि. 11 -महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या वतीने घेण्यात आलेल्या शिक्षक पात्रता परीक्षेतील (टीईटी) घोटाळेबाज शिक्षक, कर्मचाऱ्यांच्या वैयक्तिक मान्यता, शालार्थ आयडी रद्द करण्याकरिता पुणे विभागीय शिक्षण उपसंचालकांनी सुनवाणीची प्रक्रिया सुरू केली आहे. या सुनावणीला संबंधित शिक्षक, कर्मचारी, संस्थाचालक, शिक्षणाधिकारी यांना उपस्थित राहावे लागत असल्याने संबंधिताचे धाबे दणाणले आहेत.
जानेवारी 2020 मध्ये झालेल्या “टीईटी’ परीक्षेच्या निकालात फेरफार करुन अपात्र उमेदवारांना पात्र करण्यात आले. यात राज्यातील 7 हजार 880 उमेदवारांचा समावेश असल्याचे उघडकीस आहे होते. या सर्वांचे “टीईटी’चे प्रमाणपत्र रद्द करण्याबरोबर त्यांना आगामी परीक्षांना बसण्यास कायमस्वरुपी बंदी घालण्यात आलेली आहे. शाळांमध्ये कार्यरत असलेल्या शिक्षक, कर्मचाऱ्यांचे वेतन थांबवून त्यांना सेवेतून काढून टाकण्यात येणार आहे. मात्र ही कारवाई करण्यापूर्वी घोटाळेबाजांना आपले म्हणणे मांडण्याची संधी देण्यासाठी सुनावणी घेण्याबाबतचे आदेश शासनाकडून जारी करण्यात आले होते.
घोटाळेबाजांमध्ये पुणे विभागातील प्राथमिक शाळांमधील 15, तर माध्यमिक शाळांमधील 28 असे एकूण 43 शिक्षक, कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. पुणे जिल्ह्यात 7, अहमदनगरमध्ये 4, सोलापूरमध्ये 4 या प्रमाणे प्राथमिक शाळांमध्ये घोटाळेबाज आहेत. पुणे विभागीय शिक्षण उपसंचालक औदुंबर उकिरडे यांनी सुनावणीला सुरुवात केली असून, आवश्यक त्या कागदपत्रांचीही तपासणी सुरू केलेली आहे. दहा दिवसांत सुनावणी पूर्ण करण्याचे नियोजन आहे. याचा अंतिम अहवाल तयार करुन त्यात दोषी आढळलेल्यांवर कारवाई होणार आहे.