बारामती -करोना बाधित रुग्णांच्या संपर्कातील आज (मंगळवारी) सलग दुसऱ्या दिवशी आणखी दोन जणांना करोनाची लागण झाली असल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यामुळे बारामतीत करोना रुग्णांची संख्या आता सहावर पोहोचली आहे.
करोनाचे वाढते संकट पाहता बारामतीकरांनी खबरदारी घ्यावी घरातून बाहेर पडू नये. घाबरून जाऊ नये; मात्र काळजी घ्यावी तसेच प्रशासनास सहकार्य करावे, असे आवाहन प्रांताधिकारी दादासाहेब कांबळे यांनी केले आहे.
शहरातील श्रीराम नगर तसेच समर्थ नगर येथील परिसरातील तीन किलोमीटर परिसर सील करण्यात आला आहे. अत्यावश्यक सेवा वगळता इतर कोणत्याही कारणास्तव नागरिकांना घराच्या बाहेर पडता येणार नाही.
समर्थ नगर येथील 22 जणांवर गुन्हेविनाकारण रस्त्यावर फिरणाऱ्या वर कारवाईचे सत्र सुरूच आहे. पेन्सिल चौकात नाकाबंदी करून विनाकारण फिरणाऱ्या 22 जणांवर मंगळवारी गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. 19 दुचाकी जप्त करण्यात आल्या, असे पोलीस निरीक्षक अण्णासाहेब घोलप यांनी सांगितले.
एकाच कुटुंबातील पाच व्यक्तींना करोनाची लागण झाली आहे. त्यामध्ये दोन लहान मुलींचा देखील समावेश आहे. त्या पार्श्वभूमीवर आरोग्य विभागाचा सर्वे सुरू आहे. लहान मुलांच्या संपर्कात इतर काही लहान मुले आले आहेत का? याचीदेखील शोध मोहीम सुरू आहे.
लॉकडाऊनची कडक अंमलबजावणी केली जात असून शहरातील पोलिस बंदोबस्त वाढवला आहे. शहरात विनाकारण फिरणाऱ्यांवर कारवाई करण्यात येत असल्याचे उपविभागीय पोलिस अधिकारी नारायण शिरगावकर यांनी सांगितले.