नवी दिल्ली: पाकिस्तानच्या बहावलपूरमधील पोलिसांनी सोमवारी दोन भारतीयांना अटक केल्याचा दावा केला आहे. पीटीआयने जिओ न्यूजच्या हवाल्याने म्हटले आहे की, 2 भारतीयांना पोलिसांनी बेकायदेशीरपणे पाकिस्तानमध्ये प्रवेश केल्यामुळे अटक केली आहे. पोलिसांनी सांगितले की, तपासणी दरम्यान दोघांकडे आवश्यक कागदपत्रे मिळाली नसल्यामुळे त्यांना अटक करण्यात आली. दोघांनाही पंजाब प्रांतातील बहावलपूर येथे अटक केली गेली.
पाकिस्तानच्या पोलिसांनी दोघांवर गुन्हा दाखल केला आहे. त्यापैकी एक मध्य प्रदेशात राहणारा प्रशांत आणि दुसरा तेलंगणातील रहिवाशी दुरमीलाल आहे. असा दावा पाकिस्तानकडून केला जात आहे. त्यातील एक सॉफ्टवेअर अभियंता असल्याचे अहवालात म्हटले आहे. त्यांना ‘दहशतवादी हल्ला’ करण्यासाठी पाकिस्तानला पाठविण्यात आले होते असा आरोप देखील पाकिस्तानी पोलिसांनी केला आहे.
यापूर्वी ऑगस्टमध्ये पाकिस्तानच्या पंजाब पोलिसांनी डेरा गाझी खान शहरातील एका भारतीय हेर’ला अटक करून एका मोठ्या गुप्तचर संस्थेच्या स्वाधीन केल्याचा दावा केला होता. तसेच पाकिस्तानचा असा दावा आहे की, राजू लक्ष्मण नावाच्या एका नागरिकाला बलुचिस्तान प्रांतातून अटक केली गेली. येथूनच कुलभूषण जाधव यांनाही अटक केली होती.
भारतीय नौदलातील सेवानिवृत्त अधिकारी जाधव यांना एप्रिल 2017 मध्ये पाकिस्तानी लष्करी कोर्टाने “हेरगिरी आणि दहशतवाद” या आरोपाखाली फाशीची शिक्षा सुनावली होती. त्यानंतर भारताने आंतरराष्ट्रीय न्यायालयात (आयसीजे) पाकिस्तान विरोधात याचिका दाखल करून फाशीची शिक्षा रोखण्याची मागणी केली होती.