कात्रज, दि. 12 (प्रतिनिधी) -पुणे शहर-उपनगरांत रविवारी पावसाने धिंगाणा घातला. याचा तडाखा कात्रज येथील प्राणीसंग्रहालयालाही बसला. प्रवाहाच्या दाबाने संग्रहालयातील सांबरांच्या खंदकाच्या सुरक्षाभिंतीला मोठे भगदाड पडले. त्यातून दोन हरिण आणि एक सांबर वाहून गेल्याची भीती व्यक्त केली जात आहे.
येथील खंदकात 32 हरिण आणि 28 सांबर होते. दरम्यान, पावसामुळे वाहून आलेल्या पाण्याच्या प्रवाहाचा जोर मोठा होता. यामुळे खंदकास मोठे भगदाड पडले. त्यात 60 पैकी दोन हरिण व एक सांबर बेपत्ता असल्याचे संग्रहालय व्यवस्थापनाच्या लक्षात आले. त्यांनी शोधमोहीम सुरू केली. मात्र सोमवारी सायंकाळपर्यंत या जीवांचा तपास लागला नाही. घटनेची माहिती वन्यजीव प्रेमींना मिळाली. त्यांनी प्रशासनाकडे विचारपूस केली. मात्र, “असा कोणताही प्रकार घडला नाही.
सर्व प्राणी आहेत’ असे त्यांनी सुरुवातीला सांगितले. पण, लपवाछपवी लक्षात येताच नागरिकांनी कडक शब्दांत जाब विचारल्यानंतर घटना घडल्याचे प्रशासनाने कबूल केले. प्राणी संग्रहालयात यापूर्वी मोर, लांडोर, घुबड व चंदनचोरीच्या घटना वारंवार घडल्या आहेत. दोन वर्षांपूर्वी भटक्या कुत्र्यांच्या हल्ल्यात चार हरिण, काळविटांचा मृत्यू झाला होता. त्यामुळे प्राण्यांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला होता.
मी ओडिसा येथे वन्यजीव अभ्यास बैठकीसाठी गेलो होतो. मी पाच वाजता संग्रहालयात पोहचलो असून, घटनेबाबत सविस्तर माहिती घेत आहे. – डॉ. राजकुमार जाधव,संचालक, प्राणीसंग्रहालय
खंदकाला पडलेल्या भगदाडातून दोन चितळ बाहेर पडले असून, ते संग्रहालयाच्या आवारातच आहेत. ते आमच्या कर्मचाऱ्यांना दिसले आहेत. त्यांना पुन्हा खंदकात सोडले जाईल.
– अशोक घोरपडे,मुख्य उद्यान अधीक्षक, मनपा
प्राणी संग्रहालयात रविवारी रात्री झालेल्या घटनेची सविस्तर माहिती घेऊ. या घटनेची जबाबदारी निश्चित करून दोषींवर योग्य ती कारवाई केली जाईल. – विलास कानडे, अतिरिक्त आयुक्त, महापालिका