नवी दिल्ली – भारत आणि चीन दरम्यान सीमावाद सोडवण्यासाठीची कॉर्प्स कमांडर पातळीवरील चर्चेची 19 वी फेरी सोमवारी (दि. 14 ऑगस्ट) रोजी होणार आहे. पूर्व लडाख येथील उर्वरित ठिकाणांवर निशस्त्रीकरण करण्यात यावे, या मुद्यावर भारताकडून विशेष भर देण्यात येणार आहे. या चर्चेशी संबंधित असलेल्या संबंधितांकडून याबाबतची माहिती देण्यात आली.
कॉर्प्स कमांडर पातळीवरील 18 वी फेरी चार महिन्यांपूर्वी झाली होती. यावेळी होणाऱ्या चर्चेदरम्यान उर्वरित ठिकाणी निशस्त्रीकरण लवकरात लवकर व्हावे, यावर भारताच्यावतीने विशेष भर देण्यात येणार आहे.
पूर्व लडाखमध्ये तीन वर्षांपूर्वी निर्माण झालेल्या तणावानंतर उच्चस्तरिय आणि लष्करी अधिकाऱ्यांच्या चर्चेदरम्यान काही महत्वाच्या ठिकाणी दोन्ही देशांमध्ये निशस्त्रीकरण प्रक्रिया पार पूर्ण झाली आहे. दिनांक 23 एप्रिल रोजी झालेल्या चर्चेच्या 18 व्या फेरीदरम्यान भारताच्यावतीने देपसांग आणि देमचोक येथील निशस्त्रीकरणाबाबत विशेष आग्रह धरण्यात आला होता. चर्चेची 19 वी फेरी चुशुल मोलदो येथील मिटींग पॉईंटच्या भारतीय बाजूला होणार आहे, असे सूत्रांनी सांगितले.
या चर्चेदरम्यान भारतीय शिष्टमंडळाचे नेतृत्व लेह-मुख्यालय असलेल्या 14 कॉर्प्सचे कमांडर लेफ्टनंट जनरल रशीम बाली करतील. तर चीनच्या शिष्टमंडळाचे नेतृत्व दक्षिण शिनजियांग मिलिटरी डिस्ट्रिक्टचा कमांडर करणार आहेत.