मुंबई – विद्रोही साहित्य संमेलन हे 3 आणि 4 फेब्रुवारी रोजी अमळनेर येथे आयोजित करण्यात आले आहे. या 18 व्या अखिल भारतीय विद्रोही साहित्य संमेलनाचे उद्घाटन जयपूर (राजस्थान) येथील सुप्रसिद्ध विद्रोही व्यंग कवी संपत सरल यांच्या हस्ते होणार आहे,
अशी माहिती विद्रोही सांस्कृतिक चळवळीच्या अध्यक्षांनी दिली. यावेळी संमेलनाचे स्वागताध्यक्ष श्याम पाटील, मुख्य संयोजक डॉ. लिलाधर पाटील, मुख्य समन्वयक प्रा. अशोक पवार व निमंत्रक रणजित शिंदे, डी. ए. पाटील उपस्थित होते.
महाराष्ट्रात विद्रोही सांस्कृतिक चळवळीच्या माध्यमातून “विद्रोही मराठी साहित्य संमेलनांचे आयोजन करण्यात येते. आतापर्यंत मुंबई, कोल्हापूर, सोलापूर, अमरावती, नंदुरबार, सिंधुदुर्ग, धुळे ठिकाणी विद्रोही साहित्य संमेलने पार पडली आहेत.
महाराष्ट्रातील आयु. बाबुराव बागुल, वाहरू सोनवणे, डॉ. यशवंत मनोहर, डॉ. अजीज नदाफ, आत्माराम राठोड, तारा रेड्डी, तुलसी परब, जयंत पवार, डॉ. आ. ह. साळुंके, उर्मिलाताई पवार आदी सर्जनशील, प्रगतीशील साहित्यिक नाटककार, कवी आदींनी संमेलनाची अध्यक्षपदे भूषवली आहेत.
आंतरराष्ट्रीय ख्यातीचे मार्क्सवादी विचारवंत डॉ. एजाज, प्रसिद्ध शायर निदा फाजली, डॉ. उमा चक्रवर्ती, मा. सुशिला टाकभौरे, आयु. जयंत परमार, गोहार रझा, रसिका आगाशे आदींनी विद्रोही साहित्य संमेलनांचे उद्घाटने करून विद्रोही जागरात आपला सहभाग नोंदविला आहे.