पिंपरी, दि. 26 (प्रतिनिधी) – राज्यातील सत्ता संघर्षाची सर्वोच्च न्यायालयात सुनावणीला उद्यापासून (दि.27) सुरूवात होत आहे. जर देशात न्याय व्यवस्था शिल्लक असेल तर आमचा विजय होईल. दहाव्या सुचीप्रमाणे पक्षाच्या व्हिप विरोधात मतदान केल्यास आमदार अपात्र होणे ही कायदेशीर बाब आहे. घटनात्मक तरतुदीनुसार सर्वोच्च न्यायालयाने निकाल दिला तर मुख्यमंत्र्यांसह 16 आमदार अपात्र होतील. त्यानंतर सरकार कोसळेल, राज्यात राष्ट्रपती राजवट लागू होईल किंवा निवडणुका होतील, असे प्रतिपादन राष्ट्रवादी कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी केले.
राष्ट्रवादी कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष पाटील यांच्या उपस्थित सोमवारी (दि.26) काळेवाडी येथे सभासद नोंदणी आढावा बैठक पार पडली. या बैठकीनंतर झालेल्या पत्रकार परिषदेत पाटील बोलत होते. देशात जर न्याय व्यवस्था शिल्लक असेल तर आमचा विजय होईल. घटनात्मक तरतुदीनुसार सर्वोच्च न्यायालयाने निकाल दिला तर मुख्यमंत्र्यांसह 16 आमदार अपात्र ठरतील. तसेच न्याय द्यायचाच नसेल तर तो लांबणीवर टाकणे हा दुसरा पर्याय आहे. आम्हाला कुतूहल आहे, सर्वोच्च न्यायालय काय निर्णय देतेय त्याचे. त्यांनी कोणतीही कृती केली तर या देशातल्या जनतेचा न्याय व्यवस्थेवर जनतेचा विश्वास राहणार की नाही? याचाही निर्णय त्याबरोबर होईल, असेही पाटील म्हणाले.
वेदांत आणि फॉक्सकॉन कंपनी वादावर बोलताना पाटील म्हणाले, राज्य सरकारने वेदांत आणि फॉक्सकॉन कंपनीला महाविकास आघाडी सरकारने विविध सवलती दिल्या होत्या. या कंपनीचा प्रकल्प महाराष्ट्रातच होणार होता.
तळेगाव एमआयडीसीमध्ये कंपन्यांचे चांगले नेटवर्क आहे. तळेगावमधील जागेला कंपनीने सर्वाधिक गुण दिले होते. कंपनीच्या अध्यक्षांशी तत्कालीन उद्योगमंत्री भेटले होते. मात्र, आमचे सरकार गेले आणि प्रकल्प राज्याबाहेर गेल्याची टीका त्यांनी केली.
मंत्री तानाजी सावंत यांना मस्ती
अडीच वर्षे मराठा समाज काय करत होता. आताच मराठ्यांना खाज आली का? असे बोलून मराठा समाजाच्या भावना दुखवल्याबद्दल आरोग्य मंत्री तानाजी सावंत यांच्यावर मोठ्या प्रमाणात टीका होऊ लागली आहे. याबाबत प्रदेशाध्यक्ष पाटील यांना विचारले असते ते म्हणाले, सावंत यांचे वक्तव्य गंभीर आहे. याचा आपण निषेध करतो. त्यांच्या वक्तव्यातून सत्तेची मस्ती दिसून येत असली तरी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सावंत यांना अशा पद्धतीने बोलण्याचे अधिकार दिले आहेत का? असा प्रश्नही पाटील यांनी उपस्थित केला.