औरंगाबाद : लॉकडाऊनमुळे घरी जाण्यासाठी मध्यप्रदेशला पायी जाणा 16 मजूर रुळांवरच झोपले. मात्र करमाडजवळ त्याचवेळी आलेल्या मालगाडीखाली चिरडून 16 जणांचा मृत्यू झाला. ही दुर्देवी घटना शुक्रवारी पहाटे साडे पाच वाजण्याच्या सुमारास करमाडजवळील सटाण्याजवळघडली.
मध्यप्रदेशातील सादोल आणि उमरिया जिल्ह्यातील हे मजूर जालना जिल्ह्यातील चंदनझिरा येथे एका स्टील कंपनीत कामाला होते. हे 20 जण काल संध्याकाळी सात वाजण्याच्या सुमारास जालन्याहून निघाले होते. रात्रीच्या सुमारास ते करमाडजवळ पोहोचले. सुमारे 40 किमीचे अंतर पार केल्याने ते थकले होते. त्यांनी त्यामुळे झोपून सकाळी पुढे जाऊ असा विचार करत रेल्वे रूळावर ते झोपले होते.
याच वेळी पहाटे साडेपाचच्या सुमारास आलेल्या मालगाडीखाली ते चिरडले गेले. यात 15 जण जागीच मरण पावले. तर एक जण रुग्णालयात मरण पावला.
या भीषण दूर्घटनेत एक जण जखमी झाला. त्याच्यावर घाटी रुग्णालयात उपचार सुरू आहेत, अशी माहिती करमाड उपविभागीय पोलीस अधीक्षक डॉ. विशाल नेहुल यांनी दिली. या व्यतिरिक्त तीन जण या अपघातातून बालंबाल बचावले आहेत. त्यांच्याकडून अधिक माहितती मिळवण्याचा प्रयतन पोलिस करत आहेत. मात्र या घटनेचा त्यांच्या मनावर खोल परिणाम झाला असल्याने त्यांचे समुपदेशन करण्यात येत आहेत.
करमाडजवळ (ता. औरंगाबाद) शेंद्रा एमआयडीसीच्या नवीन उड्डाणपुलाजवळ घडलेल्या या काळजाचा ठोका चुकवणा-या घटनेमुळे देशभरात हळहळ व्यक्त होत आहे. कोरोना या महाभयंकर साथीने संपूर्ण विश्वाला आपल्या कवेत घेतले आहे. या संसर्गजन्य आजारातून बाहेर पडण्यासाठी देशभरात 23 मार्चपासून लॉकडाऊन लागू करण्यात आला. कुठलीही पूर्वकल्पना किंवा पूर्वतयारीची संधी न मिळाल्यामुळे देशभरात अनेक ठिकाणी अनेक मजूर/कामगार अडकून पडलेले आहेत. बस, रेल्वे सेवा बंद असल्याने अडकून पडलेल्या मजुरांची पंचाईत झाली आहे.
लॉकडाऊनचा कालावधी दोनवेळेस वाढला अजूनही परिस्थिती आवाक्यात आलेली नाही, यामुळे हतबल झालेले परप्रांतीय मजूर पायी दरमजल करत करून आपल्या गावी जाण्यासाठी निघाले आहेत. मध्यप्रदेशातील सादोल आणि उमरिया जिल्ह्यांतील हे मजूर चंदनझिरा, जालना भागातील एका स्टील कंपनीत कामाला होते. रस्त्यावर ठिकठिकाणी पोलिस अडवतात, चौकशी करून क्वारंटाईन करतील, असा अंदाज त्यांनी बांधला. यामुळे रेल्वे मार्गावरूनच ते चालत निघाले. थकल्यामुळे ते करमाडजवळ रेल्वे मार्गावरच झोपी गेले. पहाटे गाढ झोपेत असताना मालगाडीखाली येऊन त्यांचा मृत्यू झाला. चालत औरंगाबादला जाऊन तेथून मिळाल्यास रेल्वेने गावाकडे जाण्यासाठी त्यांचा प्रयत्न होता.
जालना जिल्ह्यात परप्रांतीय मजूरांना पास
जालना जिल्ह्यातून इतर राज्यात किंवा पर जिल्ह्यात जाणा-या नागरिकांसाठी जिल्ह्यात 32 ठिकाणी चेकपोस्ट तयार करण्यात आल्या आहेत. या ठिकाणी वैद्यकीय तपासणची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आल्याचा दावा प्रशासन करत आहे. परराज्यातून किंवा परजिल्ह्यातून जालना जिल्ह्यात येणा-या नागरिकांनी स्वत: वैद्यकीय तपासणी करून घेऊन दिवस सक्तीने घरातच राहावे, अशा सूचना प्रशासनाने दिलेल्या आहेत. जालना जिल्ह्यातून इतर राज्यात जाण्यासाठी कालपर्यंत 6822 नागरिकांचे तर जालना जिल्ह्यातून महाराष्ट्राच्याच अन्य जिल्ह्यात जाण्यासाठी 1328 अशा एकूण 8150 नागरिकांना पास उपलब्ध करून देण्यात आले आहेत.
हॉर्न वाजवला होता
मालगाडी चालकाने थांबवण्याचा प्रयत्न केला होता. त्याशिवाय त्याने हॉर्न वाजवून या मजुरांना उठवण्याचा प्रयत्न केला होता, असे स्पष्टीकरण रेल्वे मंत्रालयाच्या वतीने देण्यात आले आहे.
रेल्वे मार्गावर काही जण झोपले आहेत हे दिसताच चालकाने सातत्याने हॉर्न वाजवला. त्याने मालगाडी थांबवण्याचा आटोकाट प्रयत्न केला. मात्र ते शक्य झाले नाही, असे रेल्वे मंत्रालयाने म्हटले आहे.
सामान्यत: मालगाडीचा वेग 24 किमी प्रतीतास असतो. मात्र लॉक डाऊनच्या काळात प्रवासी रेल्वे बंद असल्याने हा वेग दुप्पट होता.