मुंबई- शिवसेनेच्या राज्यातील 18 खासदारांपैकी 13 ते 14 खासदार भाजपाच्या संपर्कात असल्याचा दावा भाजपा नेते प्रसाद लाड यांनी केला. शिवसेना खासदारांनी पक्षाकडे नाराजी व्यक्त केली असल्याचं सांगत त्या आधारावर 2024मध्ये हे खासदार हिंदुत्ववादी भूमिका घेणाऱ्या पक्षासोबत जोडले जातील, असा दावा केला आहे.
दिल्लीमध्ये शिवसेना खासदार संजय राऊतांनी शिवसेनेच्या इतर खासदारांची बैठक घेतली. या बैठकीमध्ये शिवसेना खासदारांनी संजय राऊतांकडे तक्रारींचा पाढा वाचला. खासदारांनी त्यांच्या मनातली तळमळ, मळमळ त्यांनी बोलून दाखवली आहे. माझ्या मते शिवसेना खासदारांना सन्मान मिळत नाही. निधी मिळत नाही. पालकमंत्र्यांकडून त्यांना विचारले जात नाही ही त्यांच्या मनातली खदखद आहे.
शिवसैनिक खासदार झालेत ते मोदींच्या नावाने निवडून आले आहेत. पण राज्यात महाविकास आघाडीचं सरकार स्थापन झाल्यानंतर शिवसेनेची हिंदुत्वाची भूमिका बदलली आहे. विकासाचा मुद्दा सोडला आहे, असं प्रसाद लाड म्हणाले आहेत.
शिवसेना प्रमुखांच्या शिवसेनेचे मुद्दे आता सोडले आहेत. त्याची नाराजी अजूनही खासदारांच्या मनात आहे. ही नाराजी 2024 मध्ये ते व्यक्त करतील. शेवटी हिंदुत्ववादी भूमिका घेणाऱ्या पक्षासोबत ते जोडले जातील, याची मला खात्री आहे. 13 ते 14 खासदारांनी स्वत:हून त्यांची नाराजी त्यांच्या नेत्यांसमोर ठेवली आहे, असे लाड म्हणाले.