कोल्हापूर – मागील अनेक दिवसांपासून महाविकास आघाडी सरकारवर नाराज असलेले स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे प्रमुख राजू शेट्टी यांनी आज अखेर मोठा निर्णय घेतला. स्वाभिमानी शेतकरी संघटना महाविकास आघाडी सरकारमधून बाहेर पडत असल्याची घोषणा त्यांनी केली. कोल्हापूरात झालेल्या कार्यकारिणीच्या बैठकीत त्यांनी याबाबत अधिकृत घोषणा केली.
2019 च्या लोकसभा निवडणुकीत स्वाभिमानी शेतकरी संघटनेने दोन्ही काँग्रेस बरोबर आघाडी केली. राज्यात महाविकास आघाडी स्थापन होताना संघटना या आघाडीत सहभागी झाली. सरकार स्थापन झाल्यानंतर अडीच वर्षात अनेकदा मागणी करूनही संघटनेला निर्णय प्रक्रियेत सहभागी करून न घेतल्याने शेट्टी यांच्यासह सर्वच नेते नाराज होते.
राजू शेट्टी यांनी आपली नाराजी पत्राद्वारे महाविकास आघाडीचे प्रमुख शरद पवार यांच्याकडे व्यक्त केली होती. मात्र कोणतीच दखल न घेतल्यामुळे अखेर आघाडीतून बाहेर पडण्याचा निर्णय शेट्टी यांनी जाहीर केला.
दरम्यान राजू शेट्टी भाजप सोबत जाणार की ‘एकला चलो’ भूमिका घेणार हे गुलदस्त्यात आहे. तर स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे एकमेव आमदार देवेंद्र भुयार यांची स्वाभिमानी शेतकरी संघटनेतून आधीच हकालपट्टी करण्यात आलेली आहे.