Rahul Gandhi – कॉंग्रेस नेते राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखालील भारत जोडो न्याय यात्रेचा प्रारंभ १४ जानेवारीपासून होणार आहे. त्या यात्रेला आसाममधील १४ विरोधी पक्षांनी पाठिंबा दर्शवला आहे.
यात्रेचा प्रारंभ मणिपूरहून होईल. ती यात्रा ८ दिवस आसाममधून मार्गक्रमण करणार आहे. त्या यात्रेला सहकार्य करण्याचा निर्णय आसाममधील विरोधी पक्षांनी घेतला. त्या पक्षांचे नेते यात्रेवेळी राहुल यांची भेटही घेणार आहेत.
त्यातून आसाममध्ये विरोधकांच्या ऐक्याचे दर्शन घडेल. भाजपच्या विरोधात लढण्यासाठी विरोधकांनी देश पातळीवर इंडिया या आघाडीची स्थापना केली.
त्याच धर्तीवर कॉंग्रेससह १५ विरोधी पक्षांनी एकत्र येत आसाममध्ये संयुक्त आघाडी उभी केली. त्या आघाडीतील इतर सर्व पक्षांनी आता कॉंग्रेसच्या यात्रेला एकमुखी पाठिंबा दर्शवला आहे.