सासवड -पुरंदर तालुक्यात पावसाचा आगार म्हणून पश्चिम व दक्षिण पट्टयातील गराडे, भिवरी, भिवडी, सोमर्डी, कोडीत, नारायणपूर, काळदरी, बांदलवाडी, पानवडी, सुपे हा परिसर ओळखला जातो. पुरंदरच्या प्रसिद्ध वाटण्यावर काळी बुरशीचा प्रादुर्भाव वाढल्याने वाटाण्याचे क्षेत्र घटले आहे. सध्या 80 ते 100 रुपये प्रति किलोपर्यंत वाटाण्याची विक्री होत आहे. 1300 हेक्टरवरील वाटाणा मातीमोल होणार असल्यामुळे बाजारभाव तेजीत आहेत.
चांबळी बोपगाव, हिवरे, कोडीत परिसरामध्ये पुरंदरचा प्रसिद्ध वाटाणा घेतले जाते. सरासरी 1300 हेक्टरपर्यंत हे पीक आहे. यावर अल्प पाऊस, वातावरणातील बदल झाला आहे. त्यामुळे करप्याचे प्रमाण अधिक असल्याने पिके धोक्यात आली आहेत.
सध्या भाताची रोपे तयार असतानाही पावसाअभावी लागवड करता येत नसल्याने शेतकरी चिंतेत आहे. पुरंदरमध्ये भात शेती सरासरी 1300 हेक्टरवर होते. लागवड फक्त 30 हेक्टरवर झाली आहे. पाऊस नसल्याने रोपे वाया जाणार आहेत. श्रावणात भात लागवड रखडली आहे. पुरंदरच्या पूर्व खोऱ्यामध्ये टोमॅटोचे सरासरी 1550 हेक्टर क्षेत्र आहे. परंतु यावर्षी 885 हेक्टरवर टोमॅटोची लागवड झाली आहे.
बाजरीची पेरणी 14908 हेक्टरपैकी 13770 हेक्टरवर झाली आहे. यंदा बियाणे निकृष्ट दर्जाचे आल्याने बऱ्याच शेतकऱ्यांना दुबार पेरणीला सामोरे जावे लागले आहे. कांदा हे पिक सरासरी 3 हजार 647 हेक्टरवर घेतले जाते. परंतु यावर्षी 2827 हेक्टरवर घेतले आहे. करोनाचा प्रादुर्भाव व बाजारभाव नसल्यामुळे शेतकऱ्यांनी शेती व्यवसाय कमी दिसत आहे.
एकरी 10 हजार खर्च
मशागतीपासून ते वाटाणा बाजारात पोहचेपर्यंत एकरी दहा हजार रुपये उत्पादन खर्च येत आहे. यात तीन मोठ्या तोडे आणि दोन छोटे तोडे, असे एकूण पाच तोड्या होतात. यातून एकरी पाचशे किलो उत्पादन शेतकऱ्यांना मिळते. प्रति किलो 80 ते 100 रुपये भाव मिळाल्यास शेतकऱ्यांना एकरी 40 हजार रुपयांचे उत्पन्न मिळते. मात्र, यंदा हवामानातील बदलामुळे वाटाण्यावर रोगांचा घाला पडला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचे हक्काचे पीक वाया जाणार आहे.