पाचगणी – भिलारच्या केम्ब्रिज हायस्कूल शाळेतील त्रासाला कंटाळून पळून निघालेल्या 13 आदिवासी विद्यार्थ्यांना अखेर पाचगणी पोलिसांनी सातारा येथील बालकल्याण गृहात दाखल केले आहे. शाळेवर काय कारवाई होणार हा प्रश्न मात्र अद्याप अनुत्तरित राहिला आहे.
याबाबत पाचगणी पोलीस ठाण्यातून मिळालेली अधिक माहिती अशी, भिलार येथील केम्ब्रिज या निवासी शाळेतील 13 विद्यार्थी शाळेतील त्रासाला कंटाळून पळून गेले होते. या सर्व मुलांना भोसे येथील युवकांनी सुखरूप पकडून पोलिसांच्या ताब्यात दिले होते. त्यानंतर रात्री उशिरा पाचगणीचे सहाय्यक पोलीस निरीक्षक विकास बडवे यांनी स्थानिक शिक्षकांच्या मदतीने जबाब नोंदवून घेतले.
या जबाबात मुलांनी शाळा प्रशासनावर अत्यंत गंभीर आरोप केले आहेत. आम्हाला कुठेही पाठवा, अथवा आम्हाला पोलीस स्टेशनमध्येच ठेवा. पण शाळेत पाठवू नका, अशी आर्त मागणी विद्यार्थ्यांनी जबाब घेणाऱ्या शिक्षकांकडे केली. याची गंभीर दखल घेऊन पाचगणी पोलिसांनी रात्री उशिरा संबंधित विद्यार्थ्यांची रवानगी सातारा येथील बालकल्याण गृहात केली. बालकल्याण अधिकारी कार्यालयाच्या समितीने आज सकाळपासूनच या विद्यार्थ्यांचे जाबजवाब घेतले.
या जबाबातून शाळेतील अनेक धक्कादायक बाबी बाहेर आल्या आहेत. शिक्षण क्षेत्राच्या नावलौकिकाला धक्का लागेल, असे अनेक प्रकार शाळेत सुरू असल्याची माहिती सूत्रांकडून येत आहे. जबाब घेणाऱ्या अधिकाऱ्यांनी विद्यार्थ्यांच्या पालकांशी संपर्क साधला असून येत्या एक दोन दिवसांत या शाळेतील अनेक गोष्टी बाहेर येतील. या मुलांचे पुढे काय होणार, शाळा प्रशासनावर कारवाई होणार का, आदिवासी विभाग शाळेतील गैरप्रकारांकडे लक्ष देणार का, याचे उत्तर बालकल्याण अधिकाऱ्यांच्या चौकशीनंतर स्पष्ट होणार आहे.