नवी दिल्ली : गेले सात आठवडे सुरू असणारा भारत आणि चीनमधील तणाव कमी करण्यासाठी तातडीने सैन्य माघारी घेण्यावर लष्करी अधिकाऱ्यांच्या बैठकीत पुन्हा एकदा एकमत झाले. दोन्ही देशांच्या लष्करी अधिकाऱ्यांमध्ये काल सुमारे 12 तास चर्चा झाली.
प्रत्यक्ष ताबा रेषेवर दोन्ही बाजूकडून असणारा तणाव कमी करण्यासाठी दोन्ही बाजूने चर्चा करण्यात आली. त्याबाबत आणखी काही बैठका अपेक्षित आहेत. राजनैतिक आनि लष्करी पातळीवरही अशी चर्चा सुरू राहील, असे सूत्रांनी सांगितले.
प्रत्यक्ष ताबा रेषेवरून फौजा मागे घेणे हा कळीचा मुद्दा आहे. त्याबाबत अंदाज, तथ्यहीन आक्षेप मागे ठेवावे लागतील, असे दोन्ही बाजूंनी मान्य करण्यात आले. ताबा रेषेच्या भारतीय भाजूला चुशूल क्षेत्रात ही बैठक झाली. सकाळी 11 वाजता सुरू झालेली बैठक रात्री अकराच्या सुमारास संपली. ही बैठक एखाद्या व्यावसायिक बैठकी प्रमाणे करोनाचे सर्व सुरक्षा नियम सांभाळून पार पडली.