Supreme Court – सर्वोच्च न्यायालयाच्या पहिल्या महिला न्यायाधीश फातिमा बिवी यांचे आज निधन झाले. या न्यायालयापर्यंत पोहोचणाऱ्या त्या पहिल्याच न्यायाधीश होत्या. त्यांच्यानंतर अन्य महिलाही सुप्रीम कोर्टाच्या न्यायाधीश पदापर्यंत पोहोचल्या. अशा महिलांची संख्या केवळ 11 आहे.
बी. व्ही. नागरत्ना: यांची ऑगस्ट 2021 मध्ये सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीश पदावर नियुक्ती झाली असून त्या 2027 मध्ये निवृत्त होणार आहेत. तत्पूर्वी देशाच्या पहिल्या महिला सरन्यायाधीश होण्याचा मान नागरत्ना यांना मिळू शकतो असेही बोलले जाते आहे. सर्वोच्च न्यायालयाचे माजी सरन्यायाधीश ई. एस. व्यंकटरमैय्या यांच्या त्या कन्या आहेत.
बेला माधुर्य त्रिवेदी: यांनी 2021 मध्ये सुप्रीम कोर्टाच्या न्यायाधीश म्हणून पदभार स्विकारला. त्या पूर्वी त्या गुजरात उच्च न्यायालयात न्यायाधीश होत्या. गुजरातमधील वादग्रस्त बिलकीस बानो सामूहिक बलात्कार आणि तिच्या कुटुंबियांच्या हत्या प्रकरणातील सुनावणीतून त्रिवेदी यांनी माघार घेतली होती.
हिमा कोहली: यांनीही 2021 मध्ये सर्वोच्च न्यायालयातील पदभार स्विकारला. तत्पूर्वी त्या तेलंगणा उच्च न्यायालयाच्या पहिल्या महिला मुख्य न्यायाधीश होत्या. 2007 मध्ये त्या दिल्ली उच्च न्यायालयात स्थायी न्यायाधीश झाल्या होत्या.
इंदिरा बॅनर्जी: 24 सप्टेंबर 1957 मध्ये जन्मलेल्या इंदिरा बॅनर्जी 1985 मध्ये वकिल झाल्या आणि त्यांनी कलकत्ता उच्च न्यायालय आणि कनिष्ठ न्यायालयांत आपली प्रॅक्टीस सुरू केली.
2017 मध्ये त्या मद्रास उच्च न्यायालयाच्या न्यायाधीश झाल्या. त्यानंतर 2018 मध्ये त्या सर्वोच्च न्यायालयातील आठव्या महिला न्यायाधीश झाल्या. 2022 मध्ये त्या पदावरून निवृत्त झाल्या.
इंदू मल्होत्रा: 27 एप्रिल 2018 रोजी त्या सुप्रीम कोर्टाच्या न्यायाधीश झाल्या. वकील ते थेट न्यायाधीश होणाऱ्या त्या पहिल्या महिला आहेत. 21 मार्च 2021 रोजी त्या निवृत्त झाल्या. त्यांचे पिताही सर्वोच्च न्यायालयाचे वकील होते. सबरीमाला प्रकरणात इंदू मल्होत्रा यांनी दिलेला निर्णय चर्चेचा विषय ठरला होता.
आर. भानुमती: ऑगस्ट 2014 मध्ये त्या सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीश झाल्या. त्या अगोदर 2003 मध्ये त्यांना मद्रास उच्च न्यायालयात नियुक्त करण्यात आले होते. जल्लिकट्टू प्रकरणाची सुनावणी त्यांच्याच खंडपीठासमोर झाली होती.
2013 मध्ये त्या झारखंड उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायाधीश झाल्या होत्या. 2012 मध्ये दिल्लीत झालेल्या सामूहिक बलात्कार प्रकरणाच्या सुनावणीच्या वेळी भानुमती बेशुध्द पडल्या होत्या.
रंजना प्रकाश देसाई: 2011 मध्ये त्या सुप्रीम कोर्टाच्या न्यायाधीश झाल्या आणि 2014 मध्ये निवृत्त झाल्या. 1996 मध्ये बॉम्बे हायकोर्टात त्यांची नियुक्ती करण्यात आली होती. त्यांना लोकपाल सर्च कमिटीचे अध्यक्षही करण्यात आले.
ज्ञान सुधा मिश्रा: यांची 2010 मध्ये सर्वोच्च न्यायालयात नियुक्ती करण्यात आली. त्यापूर्वी त्या राजस्थान उच्च न्यायालयात मुख्य न्यायाधीश होत्या.
रूमा पाल: यांची 28 जानेवारी 2000 रोजी यांची सुप्रीम कोर्टाच्या न्यायाधीश म्हणून नियुक्ती करण्यात आली आणि 2014 मध्ये त्या निवृत्त झाल्या. रूमा पाल यांनी कलकत्ता उच्च न्यायालयातही न्यायाधीश म्हणून काम पाहिले होते.
सुजाता मनोहर: 8 नोव्हेंबर 1994 रोजी सुप्रीम कोर्टाच्या न्यायाधीश झाल्या. 27 ऑगस्ट 1999 रोजी त्या निवृत्त झाल्या. केरळ आणि बॉम्बे हायकोर्टाच्या मुख्य न्यायाधीश म्हणूनही त्यांनी पदभार सांभाळला आहे.