नगर – दीड कोटी रुपये खर्च करुन होत असलेल्या राज्यस्तरीय छत्रपती शिवराय केसरी निमंत्रित कुस्ती स्पर्धा 20 ते 23 एप्रिल दरम्यान शहरातील वाडीया पार्क मैदानावर रंगणार आहे. महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषदेच्या मान्यतेने भाजप, शिवसेना व जिल्हा तालीम संघाच्या वतीने कुस्त्यांचा थरार नगरकरांसह कुस्तीप्रेमींना अनुभवता येणार आहे. या स्पर्धेतील विजेत्या मल्लास हॉलमार्क असलेली 24 कॅरेटची अर्धा किलो सोन्याची गदा (किंमत सुमारे 35 लाख) बीलासह बक्षीस स्वरुपात देण्यात येणार असल्याची माहिती आयोजकांनी रविवारी झालेल्या पत्रकार परिषदेत दिली.
यावेळी पंडित दीनदयाळ पतसंस्थेचे चेअरमन वसंत लोढा, भाजपचे ज्येष्ठ नेते अभय आगरकर, भाजपचे युवा नेते सुवेंद्र गांधी, भाजपचे माजी जिल्हाध्यक्ष प्रा. भानुदास बेरड, शिवसेनेचे जिल्हाप्रमुख अनिल शिंदे, शहर प्रमुख दिलीप सातपुते, जिल्हा तालिम संघाचे अध्यक्ष वैभव लांडगे, सचिन जाधव उपस्थित होते.
लाल मातीच्या आखाड्यात व मॅटवर कुस्त्या रंगणार आहेत. एक मातीचा आखाडा व दोन गादीचा आखाडा तयार करण्याचे काम सुरु आहे. स्पर्धेतील विजेत्या मल्लास अर्धा किलो सोन्याची गदा मिळणार आहे. तसेच द्वितीय विजेत्यास 2 लाख व तृतीय विजेत्यास एक लाख रुपयाचे बक्षीस देण्यात येणार आहे.ही स्पर्धा माती व गादी विभागात 48, 57, 61, 65, 70, 74, 79, 86 किलो वजन गटात होणार आहे. तर अंतिम छत्रपती शिवराय केसरी ओपन गट सोन्याच्या गदेसाठी 86 ते 135 किलो वजनगटात रंगणार आहे. विविध वजन गटातून विजयी होवून पुढे आलेल्या मल्लांमधून अंतिम कुस्ती लाल मातीच्या आखाड्यात होणार आहे.
स्पर्धेचे उद्घाटन दि.21 एप्रिलरोजी सायंकाळी 5 वाजता भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या हस्ते होणार आहे. स्वागताध्यक्ष माजी पालकमंत्री प्रा. राम शिंदे असून, यावेळी खासदार डॉ. सुजय विखे, खा. सदाशिव लोखंडे, माजी आमदार बबनराव पाचपुते, आमदार मोनिका राजळे, अर्जुनवीर पुरस्कार विजेते काका पवार, महाराष्ट्र केसरी पै. गुलाबराव बर्डे, पै. अशोक शिर्के, पै.संदीप भोंडवे आदींसह विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित राहणार आहेत.
अंतिम लढत दि.23 एप्रिल रोजी होणार असून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते विजेत्या मल्लास सोन्याची गदा देण्यात येणार आहे. पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या अध्यक्षतेखाली होणाऱ्या या कार्यक्रमास सहकार मंत्री अतुल सावे, उद्योगमंत्री उदय सामंत, पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील, मंत्री शंभूराज देसाई आदींसह दिग्गज नेते उपस्थित राहणार आहेत.