मुंबई – नवी मुंबई येथील विमानतळाला दि. बा. पाटिल यांचे नाव दिले जावे अशी मागणी विमानतळ नामकरण समितीने केली आहे. तसेच या मागणीसाठी 24 जून रोजी सिडकोवर मोर्चा नेला जाणार असून त्यात 1 लाख नागरिक सहभागी होतील असा दावा कृती समितीने केला आहे.
या आंतरराष्ट्रीय विमानतळाला शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे नाव दिले जाण्याचे सूतोवाच राज्य सरकारने केले असून सरकारमधील महत्वाचा पक्ष शिवसेना त्यासाठी आग्रही आहे. तरी पाटील यांचे नाव दिले जावे अशी मागणी नामकरण समितीने केली असल्यामुळे संघर्ष निर्माण झाला आहे.
दरम्यान, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेनेही या प्रकरणात एन्ट्री केली असून विमानतळाला छत्रपती शिवाजी महाराज यांचेच नाव दिले जावे. बाळासाहेब ठाकरे जिवंत असते तर त्यांनीही हेच सांगितले असते अशी आपली भूमिका कालच मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी मांडली आहे.
मात्र हे राज ठाकरे यांचे वैयक्तिक मत आहे, असे कृती समितीने म्हटले आहे. शिवसेना जर आपली शक्ती दाखवणार असेल तर आम्हीही शक्ती दाखवू असा इशारा कृती समितीने अगोदरच दिला आहे.