- वेळेत उपचार न मिळाल्याने शेतकऱ्याने गमावला जीव : करोनाचे कारण सांगत रुग्णालयांचा उपचारास नकार
लोणी काळभोर, दि. 5 (वार्ताहर) -रुग्णालयात करोनाचे रुग्ण दाखल असल्याचे कारण पुढे करत पूर्व हवेलीमधील रुग्णालयांनी अपघातामधील दोन गंभीर जखमींवर उपचार करण्यास नकार दिला. यामध्ये एका शेतकऱ्यास जीव गमवावा लागला आहे.
मंदीलाल शिवाजी कोळपे (वय 35, रा. बोरीभडक, ता. दौंड) असे या दुर्दैवी शेतकऱ्याचे नाव आहे. तर अशोक शिवाजी नवले (वय 50, रा. लोणी काळभोर) हे गंभीर जखमी झाले आहेत. विशेष म्हणजे उरूळी कांचन येथील रुग्णवाहिकेतून संबंधित शेतकऱ्याचा मृतदेह ससून रुग्णालयात नेल्यावर तेथेही चार तासांहून अधिक काळ ताटकळत ठेवल्याची धक्कादायक बाब पुढे आली आहे.
अधिक माहिती अशी, मंदीलाल कोळपे हे दुचाकीवरून आपल्या शेतातील भेंडी विकण्यासाठी हडपसर येथे चालले होते. त्यांच्यासमवेत अशोक नवले हेही दुसऱ्या दुचाकीवरुन कामाला निघाले होते. फुरसुंगी फाट्याजवळ तदोघांच्या मोटरसायकलला पाठीमागून आलेल्या चारचाकी वाहनाने जोरदार धडक दिली. यात मंदीलाल कोळपे व अशोक नवले दोघेही गंभीर जखमी झाले. स्थानिक लोकांनी रुग्णवाहिकेला बोलावून जखमींना उपचारासाठी पाठवून दिले. जखमींची अवस्था लक्षात घेऊन रुणवाहिकेचा चालक अण्णा बालगुडे व त्याचा सहकारी वैभव कदम यांनी लोणी काळभोर येथील रुग्णालय गाठले. मात्र संबंधित प्रशासनाने रुग्णालयात करोनाचे रुग्ण दाखल असल्याचे कारण पुढे करत रुग्णांना दुसरीकडे नेण्याची सूचना केली. यावर अण्णा बालगुडे यांनी तत्काळ रुग्णवाहिका कोरेगाव मूळ हद्दीतील एका रुग्णालयात नेली. तेथेही रुग्णालय प्रशासनाने असेच उत्तर दिले. या दरम्यान जखमींची अवस्था गंभीर होत चालल्याचे लक्षात येताच, अण्णा बालगुडे यांनी रुग्णवाहिका ससून रुग्णालयाच्या दिशेने घेतली. मात्र हडपसर मंदीलाल कोळपे यांच्या हालचाली थांबल्या. ससून येथील वैद्यकीय अधिकाऱ्याने कोळपे यांचा मृत्यू वाटेतच झाल्याचे जाहीर केले. ससून रुग्णालयातही कर्मचारी, पोलीस यांच्या टोलवाटोलवीला सामोरे जावे लागले.
एक जखमी मरण पावला आहे, दुसऱ्या जखमीचा तरी जीव वाचवू या हेतूने रुग्णवाहिका चालकाने आपल्या सहकाऱ्याला मृतदेहाजवळ ससून रुग्णालयात थांबवले. चालक एकटाच रुग्णवाहिकेमधून अशोक नवले या जखमीला ससून रुग्णालयातून घेऊन पुण्यातील एका खासगी रुग्णालयात घेऊन गेला; मात्र तेथेही करोनाचे कारण ऐकायला मिळाले. तेथून दुसऱ्या एका खासगी रुग्णालयात नेल्यावर त्यांनी दाखल करुन घेतले आहे.
अपघातामधील गंभीर जखमीस रुग्णालयांनी दाखल करून न घेणे, ही बाब अतिशय गंभीर व धक्का देणारी आहे. रुग्णालयांच्या हलगर्जीपणामुळे शेतकऱ्याला प्राण गमवावा लागलेला आहे. वेळेत उपचार झाले असते तर कदाचित शेतकऱ्याचे प्राण वाचले असते. ससूनमध्ये घडलेला प्रकारही चीड आणणारा आहे. वरील दोन्ही घटनांची वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्फत चौकशी करण्यात येणार आहे. यात दोषी आढळणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यासाठी आग्रही राहणार आहे.
-अशोक पवार, आमदार शिरूर-हवेली