करोनाच्या प्रादुर्भावामुळे संपूर्ण देशात जवळपास अडीच महिन्यांच्या लॉकडाऊन नंतर आता हळूहळू देश पूर्ववत व्हायला सुरुवात झाली आहे. तसेच मालिकांच्या चित्रीकरणाला देखील परवानगी मिळाली आहे. त्यामुळे प्रेक्षकांच्या लाडक्या मालिका आता लवकरच त्यांच्या भेटीला येतील. पण या अडीच महिन्यांच्या मोठ्या सुट्टी नंतर भूमिकेपासून लांब असलेले कलाकार चित्रिकरणाची तयारी कशी करत आहेत हे जाणून घ्यायची उत्सुकता त्यांच्या चाहत्यांना आहे.
“रात्रीस खेळ चाले-2′ या मालिकेतील सर्वांची आवडती शेवंता म्हणजेच अभिनेत्री अपूर्वा नेमळेकर ही देखील या सुट्टीमध्ये तिच्या भूमिकेपासून लांब गेली आहे का, असे विचारले असताना ती म्हणाली, “मी माझ्या भूमिकेपासून कधी वेगळी नव्हतेच.
प्रेक्षकांच्या आग्रहास्तव मी माझ्या भूमिकेतील फोटोज सोशल मीडियावर शेअर केले. शिवाय जेव्हा मी इन्स्टाग्रामवर लाईव्ह गेले, तेव्हा देखील मी शेवंताचा लुक केला होता. लॉकडाऊनमध्ये मी प्रेक्षकांना माझ्या पात्राशी जोडून ठेवण्याचा प्रयत्न केला आहे. शेवंताचे पात्र हे माझ्या अंगात इतके भिनले आहे की, त्यामुळे ही भूमिका पुन्हा साकारताना निश्चितच मजा येईल.’