- लाभार्थ्यांसाठी मिळणार ओळख क्रमांक : फोटोही होणार क्लिक
पिंपरी – राज्यातील जनतेला अवघ्या दहा रुपयांत जेवण देण्याच्या राज्य सरकारच्या महत्वाकांक्षी शिवभोजन थाळी योजनेला येत्या 26 जानेवारीपासून प्रारंभ होत आहे. प्रत्यक्ष गरजू लोकांपर्यंतच या योजनेचा लाभ पोहचावा यासाठी थाळी घेणाऱ्या प्रत्येकाची नोंद देखील ठेवली जाणार आहे. त्यानुसार शासनाकडे लाभार्थ्यांचे मॉनेटरिंग राहणार असल्याची बाब समोर आली आहे.
राज्य सरकारच्या महत्वकांक्षी शिवभोजन थाळी योजना 26 जानेवारी पासून सुरु होत आहे. पिंपरी-चिंचवड शहरासाठी दररोज 500 थाळीचा कोटा निश्चित करण्यात आला आहे. पिंपरी-चिंचवड शहरात कामानिमित्त येणाऱ्यांना अत्यल्प दरात जेवण मिळावे आणि त्यांची परवड होऊ नये म्हणून ही योजना कार्यान्वित करण्यात आली आहे. या योजनेचा लाभ प्रत्यक्ष गरजूंपर्यंत योजनेचा लाभ पोहचतो का हे पाहण्यासाठी योजना सुरु झाल्यानंतर शासनाकडून ऑनलाईन मॉनेटरिंग केले जाणार आहे.
थाळीचा लाभ धेण्यासाठी शिवभोजन केंद्राच्या काऊंटरवर लाभार्थ्याचे फोटे क्लिक करुन संपूर्ण माहिती संगणकात भरली जाणार आहे. त्यानंतर या माहितीचा डाटा शासनाने दिलेल्या लिंक कंट्रोलकडे जाईल आणि तेथुनच संबधिताचा आयडी क्रमांक जनरेटर होईल. तसेच त्यानंतर केंद्राच्या संगणकावर संबंधितांचा आयडी क्रमांक जनरेट झाल्यानंतरच व्यक्तीला थाळीचा लाभ मिळणार अशी प्राथमिक माहिती समोर आली आहे. शासकीय कर्मचारी व सधन व्यक्तींनी या योजनेचा लाभ घेण्यापेक्षा सर्वसामान्यांना या योजनेचा लाभ मिळावा यासाठी ही यंत्रणा असल्याचे बोलले जात आहे.