बससेवा समस्यांनी ग्रासली : अनेक मार्गावरील बस फेऱ्या घटविल्या
वाघोली- वाघोली ग्रामपंचायतीकडे देखभाल करण्यासाठी असणारी केसनंद फाटालगतची 2 एकर जागा जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाने पुणे मनपाच्या बससेवेसाठी 2 वर्षांपूर्वी देण्यात आली होती. पण बससेवा सुरळीत झाली तरीही आजही या निवारा शेड आणि तिकीट देण्यासाठी टपऱ्या उभ्या करण्यापलीकडे मनपाच्या वतीने कोणत्याही उपाययोजना न केल्याने सध्या हे बसस्थानक समस्यांच्या विळख्यात अडकले आहे. बसस्थानकात निवाऱ्याची कमरता आहे. ज्या जागेत बस डेपो सुरू करण्यात आला आहे. त्याच जागेतून बऱ्याचवेळा नागरिकांना उन्हात ताटकळत उभे राहावे लागत आहे. निवारा शेडची कमरता वारंवार भासत असल्याचे चित्र रोज पहावयास मिळते.
परिसरात कचऱ्याचे ढीग आणि धुराचे लोट पसरलेले असतात. केसनंदच्या भागातील गावांना जाणारा रस्ता याच ठिकाणाहून जात असल्याने रात्री- अपरात्री या ठिकाणच्या मोकळ्या जागेत कचऱ्याचे ढीग पहावयास मिळतात. ग्रामपंचायतीच्या वतीने वारंवार कचरा उचलून नेऊन नेऊन या ठिकाणी खड्डा देखील पडला आहे. पुणे मनपा पीएम पीएमपीएलच्या ताब्यात असल्याने या ठिकाणचा परिसर स्वच्छ ठेवण्याची जबाबदारी बहुधा पीएमपीएल प्रशासन विसरली असल्याचे जाणवू लागले आहे.
बसस्थानक समोरून अवैध प्रवासी वाहतूक सुरू आहे. अनेकवेळा गावांसाठी असणाऱ्या बसेस भरण्याच्या अगोदर अनेक अवैध प्रवासी वाहतूक करणारी मंडळी पुढील बाजूस गाड्या भरून प्रवासी वाहतूक करताना दिसत आहेत. त्यामुळे पीएमपीएलच्या उत्पन्नात घट होताना दिसू लागली आहे. तर ज्याठिकाणी कमी प्रवासी जात आहेत. तिथे बऱ्याचवेळा बसेसच्या फेऱ्या कमी करण्यात बस व्यवस्थापनाने धन्यता मानली आहे. पण अवैध प्रवासी वाहतुकीवर कारवाई होताना दिसत नाही. सार्वजनिक शौचालय आणि पिण्याच्या प्रभावी पाण्याच्या सुविधेचा अभाव आहे. वाघोलीमधून पुण्याकडे, हडपसरकडे व इतर भागात बससेवा पुरविण्यात सध्या मनपा प्रशासन यशस्वी झाले आहे. मात्र, या ठिकाणी पिण्याच्या पाण्याची तसेच शौचालयाची प्रभावी सुविधा पुरवण्यात सध्या यांना अपयश आले आहे.
- विस्तार मोठा अन् लक्षणे खोटी
वाघोली परिसरात गेल्या 10 वर्षांत विस्तारीकरणाचा वेग प्रचंड वाढला आहे. तसेच या परिसरातील लोकसंख्या लाखांवर पोहोचली आहे. त्यात पुणे शहरात नोकरी करणारे चाकरमानी या परिसरात वास्तव्यास आहेत. त्यांचा पीएमपीएलशी दररोजचा संपर्क आहे. मात्र, प्रशासन येथे सुविधा देण्यात तोकडे पडत आहेत. त्यामुळे अनेक मार्गावरील प्रवासी भारमान घटले आहे. प्रशासनाकडून घाट्याचा व्यवहार ठरवून अनेक मार्गावरील बस फेऱ्या घटविल्या आहेत. त्यामुळे नाईलाजस्तव प्रवाशांना अवैध प्रवासी वाहनांचा आधार घ्यावा लागत आहे. - वाघोलीमधील बससेवा दर्जेदार करण्यासाठी प्रशासनाने लक्ष द्यावे. ज्या उपयोगाकरिता शासनाने जागा दिली आहे. त्याचा उपयोग केवळ उत्पन्नवाढीसाठी करण्यात आला आहे. सुविधांपासून नागरिक आजही वंचित आहेत.
– संदीप शिंदे, नागरिक, वाघोली.